Sunday 19 March 2017

आत्मझुंज..!

                                                    आत्मझुंज
-                                                                                                                                                                                       शैलजा खाडे-पाटील
                                                                         
अया अया आईगंssss आरं बघ की किच्चच्या काय रगात आलंया पार आंगठा चिघाळलाया बघ!” मी इव्हळत हुतो आणि घोरपड्यांच अमऱ्या माज्याकडं बघूनशान बत्तिशी काढीत हुत. मी तेच्याकडं फणकाऱ्यानं बघितल तस तेन माझा योक हात आपल्या खांद्यावर घेतला आणि आम्ही माझ्या घरला निघालो.
 आर शिवा, लेकाच्या तरी तुला मी सांगीत
हुतो त्या सुताराच्या झाडाचं आंब आपणासनी लय महागात पडत्याल म्हणून..पर तुझी खुमखुमी नडली. त्याच्या दगडाचा मार वाचवाया गेलास आणिक ठ्याच लागून उताना झालास. तरी बर मी वाचलो बाबा. घर येईपातुर ह्यो माझा दोस्त मला लय शानपनाच डोस पाजीत हुता.
त्यो काय बोलतोय यापरास, माज्या मनात बा च्या हातातलं ठेंगड नाचत हुत. आता घरला गेल्यावर आपल काय खरं नाही या भ्यानं माजा अंगातला सदरा घामानं पार वल्ला चिप झालां हुतां. घर जवळ आलं तस मला अमऱ्यानं उंबऱ्यावर टीकीवला आणि माज्या बा च्या भ्यान त्यो पार तर्राट चालता झाला. परड्यातल्या म्हसरांच्या शेडची डागडुजी चालू हुती तोवर तात्पुरती सोय म्हणून बा म्होरच्या लांबड्या सोप्याच्या मधोमध एक तटावनी घालून दुसऱ्या बाजूला म्हसरं बांधाया जागा करीत हुता. हाय ती शेणाची भुई उकरुन त्यावर पाणी मारुन बुरुम टाकलेला, आणि त्यो बारीक बुरुम त्यो चोपण्यान चोपून बसवत हुता. जसा मी उंबऱ्याच्या आत पाऊल टाकल तस बा न माजा कानोसा घेतला.
 सुक्काळीच्या कुठं दिस-दिस भर बोंबलत फिरत हुतास, इवढी १० वी पातुर शाळा शिकीवली त्यात बी त्वांड काळ केलसं, आई बा शेतात मर मर राबतुया आणि ह्यो गावात उनाडक्या करीत फिरतुया. अस म्हणत बा न त्येच्या हातातल चोपण माझ्याकड नेम धरुन मारलं आणि ते नेमक माझ्या ठेच लागलेल्या अंगठ्यावर येऊन आदळलं.
आंगठ्याच्या पारच चिंध्या झाल्या अन् त्यातन रगात पागळु लागल. तस मी पायाचा आंगठा एका हातात उचलून दुसरा हात तोंडावर नेऊन पार बेंबीच्या देठापासनं  आरडायला लागलो. माझ्या आवाजानं मागच्या परड्यातन आई शाण कालिवतेला हात पटाकदिशी धुऊन पुसतच सोप्यात आली. तिन मला मायेन जवळ घेतलं तस मी बा कड कायतरी जिंकल्याचा आव आणूनशान नजर टाकली. बा चा रागाचा पारा हुता तसाच हुता. त्यान माज्यापाशी पडलेलं चोपण घेतल आणि बुरूमाच्या जागी मीच असल्यागत हाय नाय तेवढ्या ताकदीन बुरूम चोपायला लागला. आईन माज्या चिंध्या झालेल्या आंगठ्याकडं बघितलं तस तिला माजा लयच कळवळा आला. तीन लगट हळद आणून त्यावर टाकली तस माज्या अंगातनं साणकन् झिणझिण्या आल्या मनातल्या मनात त्या सुताराला मी एक शिवी हासडली आणि तिथच टाकून आलेल्या आंब्यासनी पण.
 आईनं तिच्या फाटक्या लुगड्याच काठ टराटरा हातान फाडून माझ्या त्या आंगठ्याला बांधत बांधत ती बा ला बोलली तुमासनी माझ्या लेकराच दुखण दिसत न्हाई व्हय, आदीच भुक्याऊन आलं असलं ते, बघिल तवा तेचा पानउतारा करीत असतायसा काय बी वंगाळ नगा बोलत जाऊ माझ्या वाणी तीनीच्या हिऱ्याला”.
तुझच लाड नडत्यात, हिऱ्याचा पार कोळसा व्हाया लागलाय दिसना व्हय तुला. बा बोलला.
आव कस बी आसलं तरी पदरच हाय ते, सगळीजण देवळात जाऊन देवाला नवस बोलत्यात पर ७ व्या महिन्याच पॉट घीऊनशान मोठ्या हौसनं त्यो ढाण्या गड चढुन माज्या मनात हेरल हुत की शिवबा राजां सारख पराक्रमी लेकरु माझ्या पोटाला याव म्हणून. 
हे ऐकुन बा उठला अन् त्यान तांब्याभर पाणी ढसढसा गळ्याखाली उतरवल...जणु त्यो माझ्यावरचा रागच त्या पाण्यासोबत गिळत हुता. डोळं पुशीत पुशीतच हात धुऊन आईनं थाटीत वाढलेलं वरण्याच्या शेंगांच कोरड्यास आणि लालभडक तांदळाचा पाण्या भात मी गट्टम केला. आंबं न्हाई ते न्हाई तरी बर या भातान मला तारल. कोन्यात गेलो आणि गुधडी अंगावर घेऊन अश्शी ताणून दिली. पडल्या पडल्या डोळा लागला. तस मला सपान पडलं त्यात मी आंब्याच्या झाडाऐवजी गडावर चढीत हुतो अन् गावातली समदी पोर बी सोबतीला हुतीत माज्या हातात एक मशाल बी हुती. ती इझु नये म्हणूनशान मी दमानं चालीत हुतो. पर चालताना माज्या पायात एक काटा रुतला, लय जोरात कळ आली. पर मशाल माझ्या हातात हुती म्हणून मी जोराच्यान माज्या पुढ चालत असलेल्या गजाला हाळी दिली. मला पायातल्या कळ नं कायबी सुदरना. मी तशीच मशाल गजाकड झोकून दिली. त्यानं बी ती आचुती झेलली आन् त्यो ती मशाल घेऊन चालू लागला. तवर मी पायातला काटा काढला..तस बळकन रगात बाहेर येऊनशान सणक भरली. तसा मी जोरात आरडाय लागलो.
 हेच्या मारी झोपत बी आराडतयं बेनं, कशाला उठतायसा आता राजं तुम्ही. त्यापरास उद्या सकाळीच उठनासा, आई बा हाय की दिमतीला तुमच्या”.  म्या खाडकन डोळ उघडलत बा बडबडत हुता.
 आन् डीरीत दूध घालायला म्हणून खुट्टीला अडीकलेली किटली काढताना ती नेमकी माज्या ठेच लागलेल्या पायावर पडली हुती म्हणून मी आरडत हुतो. पर मी सपनात बी आरडत हुतोच की. मला ते सपान खर की हे किटलीच दुखण खर काय उमगनाच. त्या इचारातच मी चुळ भरली आन रोजच्यासारखं आईनं नुकतच धार काढलेलं कासांडीतल आकडी दूध मला प्याला दिल. दुधाचा पेला रिता केला. आणि भितीच्या आरशात त्वांड बघितल व्हटावरच्या पांढऱ्या मिशा बघून माजी छाती एकदम फुलली. 
त्या मिशाकड बघत बघतच म्या आईला इचारल, आये खरचं का ग मी तुझ्या पोटात असताना, मी शिवाजी राजावानी हुशार नि पराक्रमी बनाव अस तु मनात हेरली हुतीस? मग मी त्यांच्यासारखा हुशार का नाय झालो?”
व्हय रं माझ्या सोन्या आणिक तु बाळुत्यात हुताच तवाच राजांच्या जन्मादिशी गडावर जाऊन राजांच्या पुतळ्यासमोर तुला आडव टाकल नि त्यांच उपकार मानलत. त्या शिवजयंती दिशी आपली दानत नसताना कुटन कुटन जुडणी करुन गावातल्या समद्या गोरगरिबासनी एक एक पायली जुंदळ वाटल हुतत तुझ्या बान. आई चुलीवर भात चढवीत चढवीत बुलली.
 “आये पर राजांवानी माझ्या हुशारीच काय बुलली न्हाईस ते?” आरशात बघीत केसात कंगव्यान भांग पाडीत पाडीत मी इचारल.
शिवबा च्या नावावरन तर तुझ नाव शिवा ठेवल. पर बाळा एक ध्यानात ठेव देवाचा, आणिक राजांचा आर्शिवाद जरी तुझ्या पाठन हायच. म्हणुनच सांगतो, तुझी हुशारी तुझ्या भल्या कर्मातच हाय. आर साळतल्या पुस्तकात काय समद्यांचच डोक नाय चालत, पर जे काय काम धाम करशील ते चांगल आन् जीव लावून केल की हुतय की राजावानी हुशार.असं म्हणत ती परड्याकडला एखाद दुसर शीणकुट आणाय गेली.  
साथियॉं ये तुने क्या किया..बैरिया ये तुने क्या किया... तेवढ्यात शेंगांच्या टोपल्यावर ठेवलेल्या मोबाईलची रिंगटोन वाजली. अमऱ्याचा फोन हुता.
 आर शिवा इ की लवकर, कवाधरन वाट बगतुय आम्ही सगळी चौकात इथ. अस म्हणून मी काय बोलायच्या आतच त्यान फटाक कन फोन बंद बी केला.
तेला त्याच्या टॉकटाईम ची लयच चिंता. मग मी मोबाईलच्या दोनी बाजुची टोपणं आगुदरच बांधलेल्या रबरानं आणखीनच घट बशीवलीत पार मोडकळीला आलत ते डबड. कवा ३-४ वर्षापूर्वी रमेश दाजींनी मंजे माझी चुलत बहीण गीता आक्काच्या नवऱ्यान बा ला लय हौसेन घीऊन दिलेला हुता त्यो मोबाईल. रमेश दाजी खर तर लय भला माणूस. शेतीबदलच्या कुठल्या तरी हापीसात कारकून म्हणून कामाला असलेला. गीता आक्कालाबी कधी माग सर नाई म्हणणारा. बा नेहमी मला त्यांचा दाखला दीऊन टोमणं मारायचा. मला बी वाटायच मी तेंच्यासारखा १५ वी पातुर शिकलो असतो तर, माज बी कल्याण झाल असतं. पर डोस्क्यानं साथ दिली नाई माज्या. असा इचार करीत करीतच मी सोप्यातल पॅरॅगॉन शिल्पर पायात चढविलं आणिक डीरीच्या मागच्या आळीनंच निघालो कारण डीरीच्या गल्लीन गेलो असतो तर, परतीला येताना डीरीत दूध घालाय गेलेल्या बा न मला बगुनशान परत शिव्यांचा शिमगा चालु केला असता. चौकात गेलो तर, गजा, अमऱ्या, भिका, संद्या, इठ्ठल, अशी समदीजण माझीच वाट बघीत हुतत.
आर शिवा लेकाच्या कवाच्या काय खोळंबलुय तुज्यासाटन. बर समदी ध्याना मनान ऐका र, आपल्याकड टोट्टल ३००० रु. वर्गणी म्हणून जमा झाल्यात तवा त्येचा वापर यवस्थित झाला पायजे”. अमऱ्यानं वर्गणीची वही म्होर ठेवली आणिक अजून कोण कोण वर्गणीच बाकी आहे त्यांची नाव बी वाचून दावली.
बर ते संबा तारदाळकराची गाठ घेतलीस काय र तु मांडव आणिक डॉल्बीसाटन?”  भिका संद्याला बोलला.
 आर पयला मशाल, पताका, फूल , हार, तोरण, आन परसादाचा मेनु याच काय ते ठरवूया. काय रं शिवा?”  गजानं तोंडातला मावा थुकत इचारल. त्याच्या माव्याची पिचकारी थेट माज्या पायापशी येऊन पडली. तस माज टाळकं फिरल.
ये गजा लेकाच्या मंडळाचा नियम इसरलास व्हय, सुपारीच्या खांडाला बी शिवायच नाही असं ठरलय आपल का घालू तुज्या टाळक्यात धोंडा?” मी बोललो, तस गजा चटपाटलं आणिक त्यो समदा मावा थुकून चुळ भरून आला.
  हे सगळ ठीकाय पर मला काय वाटतय, आपण या साली एकांद्या शिकल्या सवरल्या आणिक ज्याला राजांची महती यवस्थित ठाव आसल अशा माणसाला आपल्या गावात भाषणासाठी बुलिवल तर काय हुईल रं?”  इठ्ठल बोलला.
 त्योच काय ते आमच्यापैकी पुस्तकातल्या डोस्क्यानं हुशार हुता. तालुक्यातल्या कालेजात बी जाईत हुता. त्याच्या या बोलण्यान आमी समदी एकमेकांच्या तोंडाकड बगाय लागलो. त्यो बी जरा बावचळला. मग आमी जरा इचार करून ठरवितो अस त्याला सांगून टाकल तोवर त्यानं त्यो भाषणासाठीचा हुशार माणूस शोधायचा अस ठरल. परसादाचा मेनू, शिरा ठरविला आणिक शिवजयंतीच्या आदल्या रात्री कुणी कुणी कनच्या मार्गान, ढाण्यागडावरन मशाल आणाय जायाच ते बी ठरल. राजांचा पुतळा कनच्या दिशेला, मांडवाच्या मधोमध की तिरका ठेवायचा ह्याची बी आखणी झाली. डॉल्बीच बजेट लयच भारी हुत त्यामुळ डॉल्बीच मागन बघुयात अस ठरलं. मग समदी आपापल्या घराकडं पांगली. रातच्याला बाच्या तोंडाम्होर नग म्हणून रोजच्या सारखं पयला बा जेवला. मागून आई आणिक माज जेवाण झालं. परड्यात आई भांडकुंड कराया गेली. जाताना चुलीतला इस्तु निखारा तव्यातन घेऊन गेली. आणि मोडक्या शेडपाशी तीन त्यो तवा पालथा केला. मग मी बी चुली म्होरली फुकणी घेऊन परड्यात गेलो. सक्रात सपून महिना हुन गेला तरीबी अंगाला लय थंड झोंबायची, म्हणून मी तिथलच वाईच जळाण काढून त्या इस्तवावर टाकल, फुकणीन फुंsssफुंsssकरीत जाळ केला. मग आई भांडकुंड करीस्तोवर मी शेकत बसलो.
मनात नाना इचार इत हुतत. आपणाला सलग ४ वरसं वाऱ्या करुन बी १० वी का नाय सुटली...सुटली असती तर आज बा बी माज्यासुबतीला शेकत बसला असता...खरच आपण बीनकामाच हाय काय..आतापातुरच्या जिंदगीत आपुण कुणाला बी कधी दुखीवल नाय..कुणाच वाईट वंगाळ तर आपल्या मनाला बी कधी शिवल नाय...आता तर बा सारख म्हणत असतुया वरीस भरान हेला दावं लाऊन टाकायच...मग सरी ला काय सांगू? ती तर लगीन केल तर माज्यासंगंच, म्हणून अडून बसलीया माजा बी जीव तिज्यात गुतलाय...हीथ माझीच जिंदगी दावणीला लागलीया आणिक तिला बी कशाला त्या दाव्याला बांधून ठीवू?...जाळ जसा इझत चालला तशी माझ्या काळजात लयच कालवा कालव व्हाया लागली...राख हुइत आलेल्या शेणकुटावर काटकीन टोचा मारीत बसलो...नीसती काटकी शेणकुटावर टीकीवली तरी त्येच ढेपाळ हून ते इझायच...मला बी त्या ढेपाळलेल्या शेणकुटागत इझतुय का काय अस वाटाया लागल.
शिवा बाळा रात लय झालीया..कुत्री बघ कशी भुकाया लागल्यात चल आता नीजाया.आईच्या बोलण्यान मी भानावर आलो.
नीज लागली तस दुपारच गडाच तेच सपान परत पडलं. जस १० वी च्या वाऱ्या कराया लागलो तस मला सारखी गडाची, मशालीची सपनं पडत हुतीत. पर एक मातुर हुत की सपनात कधी बी मी गडापातुर पोचायचो नाय. सपान पुरं व्हायच्या आत माजा गाढ डोळा लागायचा नायतर मध्येच कायतरी खोडा होऊन मला जाग यायची. सकाळी डीरीच्या भोंग्यान जाग आली. आंगुळ-पाणी करुन चुलीम्होर शेकाय बसलो. आई बा दोघ बी आंबाड्याची भाजी, दही अन् भाकरीची न्याहरी करीत हुतत. आईन लगट च्या-वरकी खाया दिल. मला च्या मदी दुधाची घटरबुट शाय घालून त्यात वरकी बुडवून खायला लय आवडायच. म्हणून आईन माज्या च्यात वरन बक्कळ शाय वतली. ते बा ला लयच झोंबल.
घाल घाल म्हसराटाला बक्कळ शाय घाल आता ऊठून पावडर लावून हिंडायला जाणार नाही का, तवा पोटात रतीब नग व्हय तेला, हिंडायला चांगली ताकद याया पायजे. बा असा बोलला तवर आईन रागान एक नजर बा वर टाकली. तसा बा ऊठला आणिक खुट्टीवरचा वळकटीचा दोर घेऊन वैरण आणाय गेला. तवर आईन कालच्या माज्या आंगठ्याच्या जखमेवर परत दवा पाणी केल.
शिवा म्या बी आवरून शेताकडं जातु. भूक लागली की शिक्क्यावर बुट्टी हाय त्यातली भाजी भाकर खा हां”.  आई बोलली.
मी मान हालिविली. मी बी पावडर भांग आवरून बाहेर पडलो. अमऱ्याच्या घरला जायला निघालो. ४ दिस झाल तरी सरी ला बघितल नव्ह्त कससच वाटत हुत म्हणून मुद्दामच अमऱ्याकड जायचा बेत केला. कारण सरीच आणिक अमऱ्याच घर समोरासमोर हुत. गेलो तर अमऱ्या आणि त्याची आजी उंबऱ्यावरच मक्याची कणस सुलीत बसली हुतीत.
आर शिवा ते शिवजयंती दिशी कान फुटत्याल मशीन लावू नगा बाबांनो त्यापरीस आम्हां सारख्या म्हाताऱ्या-कोताऱ्यासाठी रातच्याला ग्वाड वाणी भजन किर्तन ठेवनासा”.  अमऱ्याची आजी किस्नाआई बोलली.  
बघु की किस्नाआये, तस बी यंदा बजेटमदी डॉल्बी बसतच नाय. इचार करुया तुज्या भजनाच्या कारेक्रमावर काय र अमऱ्या?” अस म्हणून मी अमऱ्याकड बघितल तवर तेन सरीच्या घराकड नजर टाकून तशीच माज्याकड वळीवली.
 मला काय कळायच ते कळल. मग मी बी कणसं सोलाय घेतली पर मनान सरी बाहेर कवा येती याची वाट बघीत बसलो. सरी कोंबडींची खुराडी झाडायला बाहेर आली. तिची बी नजर माज्याकडच गेली. पर नाक फुगवून व्हट चावीतच ती रागान आत गेली. ते तास गेला तरी बी बाहेर ईना.
आर शिवा जरा काम धाम कायतरी करीत जा. किती दिस अस गावातन मोकळा फिरायचास. हे आमच बेन अमऱ्या आणिक तु दोघं बी एकाच माळचं मणी. अशा आळसुट्यापणान तुम्हाला पुरगी बी कोण देणार नाही लग्नासाटनं. तुला सांगते शिवा ज्या पुरीच्या नशीबाला नवरा चांगला तिच समदी जिंदगी फुलावानी फुलतीया बघ. आता आमच्या दाराम्होरली सरी तिच्या बी आई बा ला लय घोर लागलाय बघ, कसा नवरा मिळतुय तिला हेचा. आंवदा तिज लगीन कराय काडलय. किस्नाआई बोलली. हे ऐकल्यावर माज्या हातातल सोललेल मक्क मी बीरमुटाच्या ढीगावर टाकलत आणिक बीरमुटा सोललेल्या मक्क्यात. माज काळीच झर्र झर्र व्हाया लागल.
आर आर शिवा काय झाल तुला बीरमुट्यात मक्क नगस टाकू. का तुला सुदरना झालयकिस्नाआईन मला टोकल तसा मी भानावर आलो. माज डोळ पाण्यान डबडबल. अमऱ्यान माज्या मनातली कालवाकालव वळखली.
आये यातली कवळी कणस सरीला बी देणार हुतीस न्हव का मक्याचा चिवडा कराया. दे मी दीऊन येतोअमऱ्या किस्नाआई ला बोलला. तिनबी आतल सुप आणल ते भरल आणिक अमऱ्याच्या हातात दिलं.
आये वाईच थांब पोटात लयच कळ मारालीया आलो मी अस म्हणून अमऱ्यान सुप ठीऊन मला डोळा मारला. आम्ही माग परड्यात गेलो आणिक....
माज्या पाखरा, मला ठाव हाय ४ दिस झाल भेट नाय. पर तु चिडु नग. आणिक लग्नाच काय बी टेन्शन घीऊ नग...मी तुला येत्या पाडव्याच्या मुहुतुरावर रितसर मागणी घालीन. तवर जीवाला जप. तुजाच शिवा.अशी एक चिट्टी लिहीली.
परत सोप्याला येऊन मक्याच सुप घेतल, सरीच्या उंबऱ्याला गेलो. सरी काला वडीत हुती. शेणाच्या हातासकट ती आमच्यासमोर येऊन उभी राहीली. मी सुपातल्या मक्क्यात चिट्टी लपिवली आणिक अमऱ्यानं ते सुप तिच्या हातात दिल.
किस्नाआईन दिल्यात मक्क तुला खायाला. आणिक यवस्थित चिवडा बनीव. खाऊन झाल्यावर सांग तुला मक्क आवडल का नाही ते.अमऱ्या तिला बोलला. माज नशीब तिला बी त्यातलं शिक्रेट कळल. ती लाजनं चुर्र झाली. तवर आतन तिच्या आईचा आवाज आला. तस तेवढ्या मिनीटभरातच म्या तिला डोळंभरुन बघून घेतलं. अमऱ्यानं माजा हात दाबला. आणि आम्ही तिथन काढता पाय घेतला.
परत दुपारच्याला घरचा रस्ता धरला. घरात गेलो पर भूक मेल्यागत झालती. नीसत घटाघटा पाणी पिऊन कोन्यात जाऊन पडलो. पर मन अजून पण सरीच्या डोळ्यामदीच घुटमळत हुत. तसाच इचार इचार करीत करीत डोळा लागला. ते थेट सांजच्याला आईच्या आवाजानच मला जाग आली.
आर बाळा तु जेवला का नाहीस दुपारच्याला, भाकर तशीच हाय वाटत शिक्क्यावर. हे घे दूध तरी पिऊन घे.आय बोलली. मी दूध पिलो पर हाय त्या गुधडीतच मान खुपसून बसलो. आईन माजा रागरंग वळकला. जेवाण करता करता तिन मला हाळी मारली. मग मी बी तिच्याजवळ चुलीम्होर जाऊन बसलो.
मला ठाव हाय समद, तु का गप गप हायस. तुज्या मनात अण्णा खोताची सरी भरलीया मी वळिकलय कवाच. खरं सांगू? मला बी ती पुरगी झाक वाटती बग. बारक्यापणा पासन तिला बगीत आलुय मी. चांगल्या वळणाची हाय लेकआय मला बोलली.
 तस न्हव ग माय पर तीज आता लगीन कराय काडलय तिज्या घरच्यांनी. आणिक तुला पटली की झाल नाय, बा ला बी पटाया पायजे. इचारान डोस्क्यात किड पडल्यागत झालय बग माज्या”. मी बोललो.
आर लेका माग मी सरीच्या बा ला तिच्या लग्नाबद्दल ताडून बगीतलय. तेला नुकरीधंदा करतेला जावई पायजे. आन् तुजा नुकरीचा पत्ता तर लांबच आणिक लोकाच्या राहील पर आपल्या सोताच्या शेतांमंदी बी कदी फिरकत नाहीस. म्हणून तर तुजा बा भी सरळ डोक्यान वागत नाय तुज्यासंग. माज ऐक लेका वाईच शेताकड ध्यान दे. तु नाय बघणार तर कोण बघणार सांग बर मला?” आय काळजीपोटी बोलली.
आये माज अज्याबात मन रमत नाय बघ शेतात. ढोरागत राबाया मला जमणार नाही. तुला कितीदा सांगु. माज्या मनाला पटल तेच मी करणार. जरा टाइम काढ. आदी लगीन हुदे मग बघतो.मी संतापून बोललो.
तशी आई गप झाली. आईन तव्यातली भाकरी काढली आन् चुलीतला निखारा बाहेर वढून त्यावर भाकरी चुलीला टिकवून खरपूस भाजाया ठेवली. चुलीवरचा त्यो रिकामा तवा बघूनशान माजी बी जिंदगी या चटकं बसतेल्या रिकाम्या तव्यागत झालीया का काय अस मला वाटाया लागल. तेवढ्यात त्यात आईन मीठ भरलेल्या वल्ल्या मिरच्या टाकल्या आणिक तेच्या ठसक्यान माजा जीव बेजार झाला. बाहेर परड्यात आलो. तिथल्या मोडक्या शेडच्या मेडक्याला टिकून उभा राह्यलो. वर आभाळाकड नजर गेली. चंद्राच्या परकाशान समद आभाळ भारल हुत. त्या चंद्राच्या जागी मला फकस्त सरीचा हसरा चेहराच दिसु लागला. आणिक तेच्या भोवतीच्या चांदण्या मंजी सरीच्या हनुटीवरच, कपाळावरच गोंदण भासू लागल. या तंद्रीतच आईन जेवाया हाळी मारली. त्या राती बा दुसऱ्या वाडीवर कुणाच तरी माहीच आवातन हुत तिकड जेवाया गेलता. मग आईची अन् माजी जेवणं झाली. तेवढ्यात इठ्ठल दारात अडखळलेला दिसला. त्यानं त्यो शिवजयंती दिशी राजांबद्दल भाषण देणारा हुशार माणूस हुडीकल्याच मला सांगितल. त्यो ज्या कालेजात जाईत हुता तिथलच इतिहासाच मास्तर भाषणाला यायला तयार झालतत. मला त्याच पटलं तवा तेच्याच फोनवरन समद्या मंडळाच्या सदस्यासनी सांगून मी त्या भाषणासाटीच पक्क करून घेतल. मग हाथरुनावर पडलो. परत ते गडाच आणिक मशालीच सपान मला पडलं....ते पुर व्हायच्या आतच गाढ डोळा लागला असल.
काय स्वारी लय खुशीत आणिक जोमात दिसतीया आज जणु? आक्शी माजा शिवा राजा शोबून दिसतुयस बघ. थांब तुजी दिष्टच काढतो. आई माज कौतुक करीत हुती. मी आमच्या स्व. आज्याचा जुना भगवा फेटा डोक्याला बांधतेल बघूनशान आईला भारी अप्रुप वाटल.
अग आये उद्याच्या शिवजयंतीच्या तयारीला चाललोय, आज राजांची मशाल आणाया जायाच हाय. मग राजावानी दिसाया नग व्हय आणिक यंदा आमी डॉल्बी न्हाय तर राजांची महती सांगणारा एक हुशार माणुस भाषणाला बुलीवलाय.मी अभिमानान तिला बोललो. मग आईला माजा लयच अभिमान वाटला. तसाच फेटा बांधूनशान चौकात गेलो. समदी दोस्त मंडळी जमून राजांसाठीच्या मांडवाची तयारी करीत हुतत. मी बी ऐदान घीऊनशान मांडवासाटन भुई उकराया घेतली.
आर हे बेन आता आपल्या सोताच्या लग्नाचा मांडव घालायच्या वाटणीच राजांच्या उत्सवाचा मांडव घालतय व्हय अजून. हेच्या नादान आमच अमऱ्या आन् गावातली पोर बोंबलत मुकळी हिंडाया चटावल्यात बगा.
 “आर हेला तर लुळी-पांगळी बी पुरगी कोण देणार न्हाय...नीसत घोड्यागत उधळत फिरतय, ना काम ना धंदा..आई बा च्या कष्टाची जरा बी चाड न्हाय बग तेला.
तेल्याचा अप्पा, पराडकरांचा दादा, अमऱ्याचा आज्जा अशी कोण नी कोण समदी मांडवाकडच्या पारावर बोलत बसली हुतीत. त्यांच हे बोलण माज्या कानावर पडल तस माज्या हातातल ऐदान हाय नाय तेवढ्या ताकदीन मी भूईत मारल तस हाताच्या इतभर आत ते ऐदान जाऊन बसल. ते काय केल्या बाहेर निघना. माज डोळं पाराभोवतनं भिरभिरु लागलत. रागानं लालबुंद झालत. पर दुसऱ्याच मिनटाला त्यातनं घळाघळा पाणी व्हाया लागल. गड्यासारखा गडी म्हणून कोणतर रडत्याल बघून हसल की काय अस वाटून मी भुईची धूळ डोळ्यांत गेल्याच नाटक कराया लागलो. आपली आपल्या घरात, भावकीत, गावात, काय बी लायकी नाय अस वाटुन मी चोरुन चोरुन मुसमुसायला लागलो. कससच व्हाया लागल. तेवढ्यात, पारावर मला एका येगळ्याच चेहऱ्याचा भास झाला. डोळ चोळून पुन्हा पुन्हा बघीतल तर त्यो राजांचा चेहरा हुता. संद्या, राजांचा पुतळा साफ करीत हुता. मी बी तेच्यापाशी गेलो. राजांची भेदक नजर,  धारदार नाक, पराक्रमी तलवार, वाघावानी निधडी छाती, बघितल्यावर माजा बी ऊर भरुन आला. त्यासनी बघितल्यावर माज्या डोळ्यातल पाणी आपोआप थांबल.
मी माज्या घशातला रडकुंडीचा आवंढा गिळीत मशालीच काय ठरलं रं?” संद्याला इचारल.
 जाऊया की रातच्याला, जेवणं आटपून. तु, मी, अमऱ्या, गजा आणिक भिका. पर शिवा तुज्या तर आंगठ्याला लागलय तुला पळायला ईल का मशाल घीऊन?”  त्यो बोलला.
माज नाव शिवा हाय, ह्या शिवबांसाटन मणभर दुखनं अंगावर घीन मी, आणिक तु या कणभर जखमचं काय कौतुक घीऊन बसलायस मर्दा.मी बोललो तस संद्यान माजी पाठ थोपटली.
 मग मांडवाच काम एकदम झाक झालं. उद्याच्या रातीला भजनासाटन वरतीकडच्या पाटणंवाडीतल्या भजनी मंडळाला यायच आवातन दिऊन आलो. त्या भाषणाच्या इतिहासाच्या मास्तरांना बी फोनाफोनी झाली. अशा समद्या तयारीत दिस कधी मावळला ते ध्यानातच नाय आलं. डीरीच्या वाटनं घरला निघालो. तवर बा डीरीत दूध घालूनशान माज्या पुढच्या पावलावर चालीत हुता. तेला बघितल्यावर मी खाल मान घालून, रस्त्याचा एक बारका दगूड पायान हळूहळू ढकलीत तेच्या माग माग चाललो. तेवढ्यात तेच्या पायतानाचा आंगठा तुटला त्यो थांबला तसा मी बी थांबलो, लगट भोसल्याच्या घराकडच्या बारक्या बोळात लपलो. बा न तुटलेल पायतान हातात घेतल. तुटलेला अंगठा परत घुसवायचा प्रयत्न केला पर तेच पायतान पायात घालायच्या बी लायकीच राह्यल नव्हत. तेच्या पायतानाला बारकी बारकी भिसकं पडली हुतीत...आणिक तरी बी त्यो पैक्याला पैका जोडीत ते जुनंपानं पायतान जमल तेवढ दिस वढीत हुता..तेला आजुबाजूच्या कसल्या जगाची नि लाजची फिकिर नव्हती.  बा च ते रुप बघून माजी मलाच लाज वाटाया लागली. मी सारख सारख माज्या पायातल्या शिल्पर कड आणिक बाच्या पायातल्या पायतानाकड बघीत हुतो. माज्या मनात नि डोस्क्यात घरच्या गरीब परिस्थितीच किडं वळवळाया लागलत. बा च साधसुध तुटलेल पायतान तेच्या मनात लपून बसलेल्या माज्याबद्दलचा मायेच्या उमाळ्याच कोड उलगडत हुत. शेवटाला त्यो आंगठा बसना म्हणून बान तसच तुटलेल पायतान चढविलं आणिक त्यो तसाच पाय वढीत पाय वढीत चालाया लागला. तसा मी बोळातन बाहेर आलो आणिक परत तेच्या माग माग चालाया लागलो. मला बी माज्या आंगठ्याच्या जखमन धड चालाया येत नव्हत. म्हणून मी बी लंगडत लंगडत तेच्या मागन चाललो. पर आमच्या दोघांच्या चालण्यात जमीन आसमानच अंतर हुत. बा ला तेची उघडी-वाघडी गरिबी चालवीत हुती पर मला माज्या अंगातली मस्ती चालवीत हुती. त्यो पायतान वढीत नव्हता तर, तेची फाटकी तुटकी जिंदगीच कशीबशी वढीत हुता. अशी फाटकी तुटकी जिंदगी माज्या बी नशिबाला नग म्हणून, आरडून-वरडून, मारुन-मुटकून कस जमल तस मला चांगल्या चुंगल्या मार्गावर लावायच्या बेतात हुता. सोताच्या गरजा मारुन मारून आई-बा माज्यासाटन तेंच जगणं पणाला लावत हुतीत. मला हे कळत हुत पर वळत नव्हत...या लाजखातर पायाच्या जखमच्या दवाखान्यातल्या इलाजासाटन बी तेंच्याकड पैशे मागाया मला लाज वाटाया लागली....
रातच्याला रोजच्यासारखी जेवणं झालीत. मशाल आणाया जायाचाय, तवा चौकात जमू. असा संद्याचा फोन येऊन गेला.
आये मी चाललो बघ मशाल आणाया. पहाटंला ईन.आज्याचा फेटा बांधीत बांधीत मी आईला बोललो.
 आर माज्या सोन्या तुजा चिगाळलेली जखम तरी बघ, कस कस जाणार तु या दुखण्यानं. आई दह्यासाटनं इरजान लावत लावत बोलली.
 आये शिवाजी राजांसाटन काय पण.. मी छाती फुलवून तिला बोललो.
बरं बरं लेका, पर दमानं जावा. संबाळा एकमेकास्नीआई काळजीपोटी बोलली.
मी चौकात गेलो तर समदी जमलेली हुतीत. समद्यांनी फेटं घातल हुतत. जय जय जय जय जय भवानी! जय जय जय जय जय शिवाजी! एकच ललकार झाला. थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद घीऊन आम्ही ढाण्या गडाची वाट धरली. समदी अणवानीच हुतीत. पर मी एकल्यानच पायात शिल्पर घातल हुत. मग मी बी पायातल शिल्पर काडून हातात घेतल आणिक चालाया लागलो.
आर शिवा लेकाच्या, शिल्पर काडू नगस तुज्या पायाला जखम हाय नि लयच चिघळल ती.भिका माग वळत वळत बोलला.
 आर शिवबानी आपल स्वराज्य मिळवाया सोताच्या जीवाची बी कधी परवा केली नाही नि मी या शिप्पीएवढ्या जखमची कशाला करु. चला बिगी बिगी...मी भिकाबरोबर येऊन त्याचा हात पकडत बोललो.
 रातीच बारा वाजून गेल आसतील. रस्याला चिटपाखरु बी नव्हत. बाजूच्या शेतातल्या ऊसाच्या पातीचा सळसळ आवाज साथीला हुता.  नि मधनच एकांद्या घुबडाच वरडणं कानावर यायच. काजव्यांची किर्रकिर्र कानावर पडायची. घाटाकडन जाताना खालच्या अंगाला डबऱ्यात छोट्या छोट्या वाड्या वस्त्या मधलं मिणमिणत दिव बघितलत की धीर यायचा. कोणतरी आणखी चार माणसं संगतीला हायत अस वाटायच. जास्तच दम लागाया लागला की राजांचा नावाची गर्जना करायचो मग चालायला आणखीनच हुरूप यायचा. आमी मशालीच्या इराद्यान झाप झाप पावल टाकीत हुतो. तेवढ्यात मागन फटफटीचा आवाच आला. ती फटफट आमच्या बरोबर चालू लागली.
 आर दोस्तांनो आस चालीत चालीत गडावर पोचाया तुम्हाला उद्या दुपारच १२ उजडलंत्यो इठ्ठल हुता. तेच्या बा ची फटफट घीऊन त्यो आमच्या मागन मागन आलता.
 शिवा तुज्या पायाला लागलय तू बस गाडीवर आपण म्होर जाऊन मशाल आणू. ती इझणार नाही अशी गाडी मी चालिवतो बेतान. आणिक अर्ध्या वाटपासन मागारी समदी मशाल घीऊन परत येऊया बघा इचार करा लवकर”. फटफटीवरन लुडबूडीत लुडबूडीत त्यो बोलला.
 मी बसणार नाही गाडीवर.  दुसर कोण बी जावा, मी राजांसाटन असाच रातभर चालाया लागल तरी चालीन. काय बी होऊदे.मी घाम पुशीत पुशीत बोललो.
पर संद्याला इठ्ठलच म्हणणं पटल. तेला टाईम महत्वाचा हुता आणिक उजाडत्या येळी शिवजयंतीच्या बाकीच्या तयारीला बी लागायच हुत.  मग त्योच गाडीवर बसुन गडावर मशाल आणाया गीलीत. आम्ही चालीत राह्यलो. चालताना माज मन थाऱ्यावर राहीना..म्हणजे राजांचा इचार डोक्यात घोळत हुता. कवा ४ थी च्या पुस्तकात तेंचा इतिहास वाचला हुता, त्यावर नाही. पर तेंच्या महतीच्या खाचाखोचा मला मालूम नव्हत्या. ते इतिहासाच मास्तर राजांबद्दल काय काय सांगणार आसतील बर?..आपण तर राजांच्या नखाशी बी सर करू शकत नाही. नुसता तेंचा उदो उदो करुन उपयोग नाही तर तेंच्यावानी गुणान बी आपण बनाय पायजे. मग समदीजण मला नावजतील...पर आस काय कराया पायजे बर..? आस समद डोक्यात चालू असताना तास २ तास तरी गेला असल तवर समोरनं गाडीची लाईट डोळ्यांवर पडली. इठ्ठल आणिक संद्या मशाल घीऊन आलीत. संद्या गाडीवरन उतरतोय न उतरतोय तेच मी तेच्या हातातली मशाल माज्याकड घीतली. आणिक हाय ती वाट माघारी फिरवून भारभार पावल टाकाया लागलो. समदी माज्या सुबतीला चालाया लागलीत. राजांच्या उत्सवाची पुढची समदी तयारी कराया, स्वागत कराया इठ्ठल आणिक संद्या म्होर गाडीवरन निघून गेलीत. पहाटच ४ वाजाया आल असतील. गार गार वार अंगाला झोंबत हुत. फेट्याचा तुरा त्या वाऱ्याच्या नादावर नाचत हुता.  
आर शिवा तुच मगापासन मशाल घीतलीयास. तुजा आंगठा बघितलास काय पार चिंध्या झाल्यात तेच्या चालून चालून. मशाल जरा माज्याकड बी दी की मर्दा..त्या आंब्याच्या झाडाखाली टीकुया. जरा दमान घीऊया आणिक मग धरु गावचा रस्ता.गजा मला बोलला.
 नाय नाय नाय मशाल माज्या हातातच राहील. काय नाय होत माज्या जखमला, अस कितीस गाव लांब राहीलय तवा..चलाअस म्हणत मी माज्या चालण्याचा वेग वाढीवला..
थोड थोड पळायाच लागलो. कसलच भान नव्हत मला. ना झोंबणाऱ्या वाऱ्याच, ना भळभळणाऱ्या जखमचं. जखमतनं रगात टपकत हुत..तेच वण माझ्या प्रत्येक पावला पावलाला उमटत हुतत...जस काय ते माझ्या असण्यान नसण्याची जाण मी चालीत असलेल्या वाटला करुन दीत हुतत. घामानं आंग निथळत हुत. पायाच्या पिंडऱ्यासनी चालून चालून पेटकं आलं हुतत. पर कशाचीच तमा नव्हती. प्रत्येक पावलाला हातात अभिमानानं धरलेल्या मशालीची मूठ आणिखीनच आवळत आवळत चालली हुती. शिवाजी राजांसाटनं ह्यो शिवा ऊर फाटस्तोवर चालीत हुता, पळीत हुता. समदं देहभान हरपला हुता. फकस्त राजांच्या चेहऱ्यावरच तेज मला डोळ्यांसमोर दिसत हुत. इतिहासाच्या मास्तरांकडनं राजांची महती ऐकायला मिळणार म्हणून, मी येगळ्याच तोऱ्यात हुतो. चालत चालत कोण कुणासंग काय काय बोलतयं ह्याकड तर माज आजिबातच लक्ष नव्हत. तांबड फुटल हुत. लवकरच गावाची वेस आली. संद्या न तुतारी वाजिवली नि समद्यांना अष्टीगंधाचा नाम वडला. मग मांडवात गेल्यावर समद्यांनी राजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. त्यांच्या शेजारी म्या मशाल उभी केली. त्यांना भगव वस्त्र अर्पण केलं. राजांच्या गळ्यात फुलांचा हार घालून नाम वडला. प्रत्येकांन कपाळी नाम वडून राजांना जीवा-भावान वंदन केल. मग समद्यांनी १० वाजता भाषणाच्या वेळी चौकात जमू अस ठरलं.
      घरला गेलो तर आई माजीच वाट बघीत हुती. तिन राहवून राहवून आंगठ्याच्या जखमवर दवापानी केलं. आणिक ती कपाटातल्या डब्यात बराच वेळ कायतरी शोधत राहीली. मग तीनं कारेक्रम झाल्यावर जखमवर इलाजासाठी दवाखान्यात जायाला माज्या हातावर २०रु. टीकीवलत. बा न माजी काय इशेष चौकशी केली नाही. परत चा-पाणी आटपून मी बाहेर पडलो. जाताना आईला आज शेतात न जाता चौकात राजांविषयीच भाषण ऐकायला या अस सांगाया इसरलो नाही. ते ऐकून, बा न जाताना माज्याकड बघूनशान नजरनचं चौकात यायची मूक संमती दिली.
      जाताना मुद्दामच अमऱ्याच्या सोबत जाऊ असा विचार केला. थेट अमऱ्याच्या दारात जाऊन तेला मोठ मोठ्ठ्यान हाळी माराया लागलो. तस किस्नाआई बाहेर आली आणिक अमऱ्या कवाच चौकात गेल्याच तिनं मला सांगितल. मी उंबऱ्यापासन माग वळलो तोच सरी तिच्या दारात रांगुळी काडीत हुती. माज्या आवाजान तिन माज्यावर नजर रोखली. मी बी तिच्या डोळ्यात डोळ घालून बघाया लागलो. माज्या सुख दुःखाला ती जिंदगीभर साथ देईन अस तिच डोळ मला सांगीत हुतत. शेवटाला तिनच लाजेनं नजर हटवून ती आत पळाली. मी परत भानावर आलो.
     चौकात आलो. जय जय जय जय जय शिवाजी!...जय जय जय जय जय भवानी! शिवछत्रपती महाराज की ज्जय्य!!!! समद्यांचा आवाजाचा नाद पार गावच्या वेशीपातुर घुमाया लागला. गावातली म्हाता-कोतारी, बाया-माणसं, पोरं-बाळ चौकाच्या तोंडाला यीऊनशान थांबलीत. तस ढोल-ताशांचा आवाज एकदम तालात घुमाया लागला. गावातली शाळंची पोरं लय हौसनं मांडवाम्होर लेझीम खेळलीत. भिका आणिक मी बापू सावंताच्या घराकडं गेलो. तेनीच परसादाचा शिरा बनिवला हुता. तेच आख्ख पात्याल आणून मांडवाखाली ठेवल. गावचं सरपंच, थोरं-मोठी मंडळी समदी जमली. समद्यांनी राजांना हार-फूल अर्पण करुन मनापासन वंदन केल. आया-बायांनी बी राजांना ववाळलं नि त्यांनी, पयल्या दिवशी राजदरबारी..आला वंशाला असा केसरी...बाळशिवाजी पयल्या अवतारी...जो बाळा जो जो रे जो असा राजांचा पाळणा बी म्हटला. तेवढ्यात संद्यान तुतारी फुंकली. इठ्ठलच्या मागोमाग ते भाषणासाटीच इतिहासाच मास्तर येत्याल दिसलं. मग इठ्ठलनच श्री. आनंद पवार अशी त्यांची समद्यांना ओळख करुन दिली. फूल, नारळ देऊन सरपंचांनी त्यांच स्वागत केल. राजांना वंदन करुन ते भाषणासाटी उभं राहीलत. परत एकदा राजांच्या शिवगर्जनेचा ललकार चहुबाजूंनी घुमला.
जिजाऊशहाजी पुत्र क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर श्रीमन्महाराजाधिराज शककर्ते स्वराज्यनिर्माते श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की- असं त्या मास्तरांनी पुकारल्यावर आम्ही समदी जण हाय नाय ती शक्ती एकवटून जय! बोललो.
गावातले आदरणीय मान्यवर, तरुण तडफदार युवावर्ग, आणि माझ्या बंधु आणि भगिनींनो, आज महनीय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही इतक्या उत्साहाने साजरी करताय ते पाहून मला अत्यंत आनंद होतोय. सुमारे ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला आपण लोक अजुनही या शिवउत्सवाच्या माध्यमातून जिवंत ठेवलयं यातच खर तर शिवछत्रपतींच्या खऱ्याखुऱ्या महतीची आपणास प्रचीती येते. आज आपल्या समाजाला खरंतरं राजांच्या महान आणि दूरदृष्टी असणाऱ्या विचारांची गरज आहे. राजांनी स्वराज्याच्या शत्रुंवर कधी शक्तीनं, तर कधी युक्तीनं विजय मिळवला. त्यामुळच ते यशवंत आणि किर्तीवंत बनले. आज समाजकारण, राजकारण, अर्थकारण, अशा विविध क्षेत्रांमध्ये जो भ्रष्टाचार, अन्याय सुरु आहे ते पाहता यावर मात करण्यासाठी आपण राजांच्या कर्तृत्ववान विचारांचे अवलंबन केले पाहिजे. तुम्हाला सांगतो मित्रहो, राजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यातही एवढ्या तन्मयतेन सांगितला जायचा, वाचला जायचा की त्याकाळीसुध्दा, युरोपमध्ये द लंडन गॅझेट या दैनिकात पहिल्या पानावर २० फेब्रुवारी १६७२ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची सुरत लूटीच्या दुसऱ्या छापाची बातमी आली होती. म्हणूनच लोकहो, असा सामर्थ्यवंत आणि वरदवंत राजा आपल्या महाराष्ट्रात घडला याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहीजे. राजांच्या अंगी प्रखर देशप्रेम ओतप्रोत भरल होत. आपल्या राज्यातील सगळ्यांना ते समान न्यायाची वागणुक देत असत. आज आजुबाजूला दिल्लीतल्या निर्भया सारखे आया-बायांवर अत्याचार होत असताना आपण पाहतोय. त्यासाठी सरकारने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी सुध्दा गंभीरपणे कुणी करताना दिसत नाहीय. पण ३५० वर्षांपूर्वी राजांनी आया-बायांवर अत्याचार करणाऱ्यां दुराचाऱ्यांना कठोर शासनाची शिक्षा सुनावल्याच इतिहास आपल्याला सांगतो. आणि तेवढाच जरबही त्यांच्यावर बसत असे. राजांनी नेहमीच आपल्या जनतेच्या भल्याचा विचार केला. त्यांनी प्रत्येक कार्यात दूरदृष्टी ठेवली.
 आजच काय तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यकाळातही स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या देशप्रेमींना राजांच्या पराक्रमातून प्रोत्साहन मिळाल्याच दिसतय. म्हणूनच, स्वातंत्र्या आंदोलनाची प्रेरणा आम्हास छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रातून मिळाली अस नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते. हा सगळा पराक्रमाचा इतिहास पाहता निश्चयाचा महामेरु. बहुत जनासी आधारु. अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी असा राजांचा गौरव केला जातो. तर, राजे हे केवळ जनतेच्या समस्यांचेच न्यायनिवाडा करणारे राजे नव्हते तर, ते एक उद्योगशील अर्थतज्ञही होते. त्याकाळी समाजाला जाचक कराच्या जाळ्यांत न अडकवता समाजातील शेतकरी, कष्टकरी आणि विविध वर्गातल्या जनतेची मिळकत, उत्पन्न यांचा सारासार विचार करुनच राजे करवसुली व आकारणी करत असत. राजांच्या ताब्यात जवळपास ३६० च्या वर किल्ले होते. राजांना शेतकऱ्यांविषयी उमाळा होता. म्हणूनच त्यांनी दुष्काळा वेळी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना बैलजोडी, नांगर, बी-बियाणे यांचे मोफत वाटप केले. या संदर्भात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी लंगोट्यास देई जानवे पोशिंदा कुणब्याचा, काळ तो असे यवनाचा, कुळवाडीभूषण पोवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजींचा. या शब्दांत शिवाजी महाराजांचा गौरव केला आहे. राजांच्या सैन्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे मावळे होते. आजही जातीभेदाला खतपाणी न घालता शिवरायांच्या समतेच्या विचारांची कास आपण सर्वांनी धरली पाहिजे असं मला मनापासुन वाटत. आपल्या साथीदारांना त्यांनी कधीही दुजाभावाची वागणुक दिली नाही. म्हणूनच स्वराज्याचा शत्रू म्हणुन चाल करुन आलेल्या अफजलखानाचा कोथळा त्यांनी बाहेर काढला. राजांना आपल्याच राज्यातील नव्हे तर शत्रुच्याही आया-बहिणीं विषयी कमालीचा आदर होता. इतिहासातही याबाबतचा दाखला पहायला मिळतो की, छत्रपती शिवाजी राजांचा सर्व सैनिकांना सक्त हुकूम होता की, धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ, स्रिया, लहान मुले, यांचा आदर करा. अस  मोगलकालीन इतिहासकार, काफिखान यांन लिहून ठेवलय. स्वच्छ आणि निष्कंलक चारित्र्य हे राजांच्या व्यक्तीमत्वाचे महत्वाचे वैशिष्ट्य होय. राजांच्या राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी लोककल्याण हेच उद्दिष्ट्य होते. आज येथे मोठ्या संख्येने युवा वर्ग जमलाय त्या सर्वांना मी एवढच सांगु इच्छितो की  भलेही परिस्थितीने तुम्ही कितीही गरीब, मागासलेले, रंजलेले, गांजलेले असा पण आपल जीवन जगत असताना राजांसारख उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेवा. आपल्या कुटुंबाला, समाजाला उपयोगी असणार काम करा. आपल्या आई-वडीलांना मान खाली घालायाला लावणार अस कोणतंही कार्य करू नका. जे काही चांगल कराल ते तन-मन-धन अर्पूण करा. आपला स्वाभिमान कधीही गहाण टाकू नका. जातीभेद मानू नका, सर्वांना आपल्या चांगल्या वर्तणुकीतुन आपलसं करा. माणुसकी अंगीकारुन जीवनात एक चांगला माणुस म्हणुन नावारुपाला या. हे सर्व जर तुम्ही केलात तर कुटुंबाचीच काय पण आपल्या सबंध देशाची सेवा तुमच्या हातुन आपोआपच घडेल. अस घडल तरच शिवरायांच्या गुणांचा आपण खऱ्याखुऱ्या अर्थाने आपण स्वीकार केलाय याच समाधान मिळेल. शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी.  अशा या पुण्यवंत, नीतिवंत, जाणत्या राजाला माझा कोटी कोटी प्रणाम!”
     दुन्ही कानात जीव एकवटुन मी ही राजांची महती ऐकत हुतो. तेवढ्यात टाळ्यांच्या कडकडाटानं मी भानावर आलो. भाषण संपलं हुत. बोला शिवछत्रपती महाराज की ज्जय! जय जय जय जय जय भवानी!  जय जय जय जय जय शिवाजी! अशी एकच ललकारी आभाळात घुमली.
     ती नुसती ललकारी नव्हती तर माज्यातल्या आजपातुरच्या जाग्या न झालेल्या आतल्या शिवाच्या असण्या नसण्यावरचा त्यो घाला हुता. मास्तरांच्या भाषणातला एक नि एक शब्द माज्या मनातल्या नि मेंदुतल्या नसानसात जळवां प्रमाण चिकटला हुता आणिक त्यातल समद आळसुटपण, भित्रपण शोषून घेत हुता. समद्यांच्या नजरेतला नाकर्ता शिवा आज राजांची महती ऐकुन आतन पार ढवळुन निघाला हुता. मास्तरांच शिवबांच्या महतीच शब्द कानात घुमत हुतत तवाच शिक्षणाच्या शाळेत नापास झालो तरी आयुष्याच्या शाळेत पास व्हायचच असा पक्का निर्धार या शिवानं केला.
     आता काय बी झाल तरी आपण स्वतः बदलुन, आपल्या जिंदगीचा बुरूज ढासळु द्यायचा नाही अशी मनाशी गाठ बांधली. स्वतामधल्या बेताल शिवाशी लढवय्या बाण्यान झुंज दिऊन जिंदगीत चांगला शिवामाणुस बनायचच हेबी डोक्यात फिट्ट केल. मला पडत असलेल्या सपनाचा खराखुरा अर्थ मला आज उमगाया लागला ... आणि याच इचारानं मी तिथन चालता झालो. मांडवाकडची वाट तीच मातीन धुळलेली हुती.. पर त्या वाटवरन चालणारा आजचा शिवा मातुर येगळा हुता. ती वाट हटके हुती..मी चांगला माणुस व्हायच्या जवळ जाणारी हुती. ती आजपातुर माज्या मनाला चकवीत आली हुती पर आज त्याच वाटनं जायच अजाबात फसायच नाही म्हणुन मी चालता झालो. मुठी आवळुन राजांच इचार मनाशी बांधून एक एक पाऊल टाकु लागलो. सरीच्या घराची वाट, माज्या घराची वाट नाय तर मी माज्या शेताकडची वाट धरली....तिकड वळता वळताच मी बा कड नजर टाकली... बा मांडव्याच्या कोपऱ्याला परसादाचा शिऱ्यासाटनं लाईनीत उभा हुता, आणिक त्यो बी माज्याकडच टक लावून बघीत हुता...तवाच कधी न्हाय ते लय वर्सांनी मला त्याच्या तोंडावळ्यावर माज्याबद्दलच्या चिडी एवजी बोलका अभिमान क्लीयर कट्ट दिसला....!
............................................................................................................................
-                                                                                                                                                                शैलजा खाडे-पाटील. 

Monday 13 March 2017

'चहा' पे चर्चा

चहा पे चर्चा

                                                                                         शैलजा खाडे पाटील

     बऱ्याच दिवसांनी आकु चा फोन आला. तिचा फोन म्हटलं की हातात असेल ते काम मी बाजूला ठेवते कारण आकु ही व्यक्तीच अशी आहे की तिच्याशी बोलल्यावर मला एकदम फ्रेश वाटत. माझी मैत्रिण आकांक्षा तिला लाडीगोडीन मी आकुबोलते. ती व्यवसायानं डॉक्टर आहे. असचं बोलता बोलता मला तिन विचारलं, काय गं तुझं सर्वांत आवडतं काम कोणत?’ तिच्या या प्रश्नावर मला फारसा विचार करावा असं वाटलचं नाही अन् अगदी सहज मी बोलून गेले...सकाळी ८ वाजता चहा बनवून तो पिता पिता पेपर वाचन करणे. तिला पण मजा वाटली ऐकून. पण, ती डॉक्टर असल्यानं खूप चहा घेत जाऊ नको, असा आरोग्यवर्धक सल्ला दिला. मग वर्तुळात वर्तुळे असतात तसे आमचे विषय झाले.
     मग माझ्या मनात विचार आला खरचं आपल आवडतं काम चहा बनवून तो पिताना पेपर वाचणे हेच आहे का? (इथे मी चहा घेताना नव्हे तर पिताना असा शब्द वापरते कारण मी कोल्हापूरी आहे! ) तेव्हा माझा मेंदु आणि मन या दोहोंच्यात जबरी लढाई झाली. शेवटी दोघांच्यात मांडवली होऊन अंतिम विजय माझ्या वरील आवडीचाच झाला. मी या माझ्या आवडीच कारणंही शोधलं ते असं की, चहाचे घुटके घेत-घेत बराच वेळ पेपर वाचत मला, स्वतःला समाजात घडणाऱ्या घटनेतील मानवी अनुभवांशी निगडीत, आनंद, दुःख, समाधान अशा कित्येक भावनां जाणून घेण्याची संधी या चहाच्या निमित्तान मिळते. कारण असा निवांत वेळ चहाच्या वेळीच भेटतो. घोटभर चहा पिला की पोटभर ढेकर यावा असा उत्साह मिळतो.                                                     साधा चहा, स्पेशल दुधाचा चहा, कोरा चहा, ग्रीन टी, लेमन टी, गुळाचा चहा असे चहाचे सर्वसाधारण प्रकार. हल्ली, ग्रीन टी प्यायची एक वेगळी फेज आहे. कॅलरी बर्न होण्यासाठी, डाएटींगसाठी, वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेशीर असल्याच बोलतात. मध्यंतरी एका मराठी चॅनलवर दुपारच्या रेसिपी शोमध्ये चक्क चहा कसा बनवायचा? याची रेसिपी दाखविण्यात आली. म्हणजे, चहा सुध्दा बनविण्याचे नाना प्रकार असतात. साधा चहा म्हणजे कोरा चहा उकळवून त्यात दूध ओतायच तर स्पेशल चहा म्हणजे दुधामध्येच बाकीचे जिन्नस टाकायचे असं काही तरी.
      मधुमेहींना विनासाखरेचा चहा लागतो. माझ्या घरी माझी आई आणि वडील दोघेही मधुमेहाचे पेशंट्स, पण चहाचे पक्के चाहते. मध्यंतरी त्यांनी Sugerfree गोळ्या घालून चहा पिण्याचा प्रयोग करुन पाहिला. आई चहा ठेवायची व पप्पांना  विचारायची, अहो किती गोळ्या घालु? (बंदुकीतल्या नव्हे तर Sugerfree बरं का! ) मग आम्हा भावंडांच्यांत एकच हास्याचा फवारा उडायचा. पण नंतर त्यांना गोळ्या आवडेनाशा झाल्या...बोलले कृत्रिम ते कृत्रिमच व सरळ फक्त चहापूड टाकूनच विनासाखर त्यांचा डेली टी सुरु झाला. कोऱ्या चहानं बिघडलेलं पोट व दुखणारं डोक शांत व्हायला मदत होते असं बोलतात. लेमन टीने सुध्दा हा फरक जाणवतो.
     मला आवडणारा चहा म्हणजे गुळमाट असा गुळाचा चहा. ऊसाच्या मळ्यांभोवती असणारी धगधगती गुऱ्हाळघरे म्हणजे अणुऊर्जा आयोगाचा एखादा मोठा अणु प्रकल्प आणि तो फिका पडावा असा त्यां गुऱ्हाळघरांचा थाट!  या गुऱ्हाळघरातील ताज्या गुळाचा चहा पिणं म्हणजे असा अणुप्रकल्प यशस्वी होण्यासारखा आनंद ...एकदम मस्त!.
     पूर्वी आमच्या आजोळी फक्त गुळाचाच चहा बनवला जात असे. तेव्हा साखऱ्या फक्त नावालाच. तर, माझी आजी पसरट अशा छोट्या हंडीत चुलीवर चहा चढवायची...पाणी, चहापूड ( मगदुम चहापत्तीच बर का! ) आणि गूळ असं उकळवून कोमट करून ठेवायची, आणि प्रत्येकाची अंघोळ झाली की, चुलीपुढं शेकायला बसायचं...मग आजी वाटीमध्ये गुळाचा काळा कोमट चहा ओतायची व वरुन कोमट दूध घालायची, कारण कोऱ्या गुळाच्या गरम चहामध्ये गरम दूध घातलं की चहा नासतो. (म्हणजे फाटतो) मग मस्तपैकी १ मोठी वरकी (आत्ताचे जिराविरहित मोठे बटर) चहासोबत खाल्ले की काम फत्ते!
     प्रत्येक घरामध्ये असणारा चहा चवीने व सुगंधाने वेगळाच असतो. गावाकडे गेलात तर तिथे काळा चहाच भेटणार म्हणजे, रेग्युलर चहा पण, दूध अगदी नावालाच. आणि गोड इतका की एकदा चिकटलेले ओठ परत उघडतील की नाही याची खात्री चहा संपेपर्यंत करुन घ्यावी लागते! .  पण अशा चहामध्ये गावाकडची माया विरघळलेली असते, हे वेगळं सांगायला नको. शहरातला चहा म्हणजे पांढरा चहा. पांढरा चहा म्हणजे कोऱ्या चहात दूध भरपुर सायीसकट घातलेलं किंवा स्पेशल दुधाचा चहा व चवीलाही कमी गोड. खरतरं इथं काळा, पांढरा असा भेदभाव नाही करायचा मला... फक्त प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक घरातली चहा बनविण्याची, त्याच्या चवीची रित वेगवेगळी असते हे सांगण्यासाठी या काळ्या, पांढऱ्या शब्दांची ही रंगपंचमी!
      दुधाच्या सायीवरुन एक आठवलं...माझ्या आजोळी, माझी मामेभांवडं यांना चहामध्ये Compulsory दुधाची साय लागतेच. आणि त्यामध्ये पार्लेची बिस्किटं कुस्करुन चमचानं खाणारं हे लोकं. लहानपणापासूनच सवय. मग याच कारण मला कळलं ते असं- शहरात कसं Bornvita किंवा Complan दुधात टाकून ते चॉकलेटी मिश्रण पितात अगदी तसचं हे असं मिश्रण पिण्यात त्यांनाही आनंद भेटतो.
     चहा पित पित एकट्यात जाणं हा एक खास अनुभव. म्हणजे हातात गरमा गरम चहा व तो पित-पित एकट्यानंच विचार करत एकांतात बसायच. अशा वेळी, चहाची Quantity खूप लागते बरं का. म्हणजे, मोठ्ठाले मग, मोठे कप असं काही तरी. कारण इवलुशा कपातून चहा पिताना दोन घुटक्यात तो चहा संपला की एकांतात मनात येत असणाऱ्या विचारांनाही पूर्णविराम भेटतो.
     चहा हे असं पेय आहे की, त्यासाठी आपणांस नुसत निमित्त असल की झालं. शिवाय, खिशालाही परवडतं हे वेगळं. जुने मित्र, मैत्रिण भेटले की चला चहाला...रट्टा मारुन अभ्यास करायचा फटाक कन कपभर चहा घेउनच बसायच. कुठलाही पाहुणा ऐनवेळी दारात थबकला टाका चहा. अगदी नवी नवी ओळख झाली चहा घेउ?. सहज कोणाची विचारपूस करावीशी झाली चहापाणी झालं का?. दिवसाची सुरुवात गरमागरम वाफाळत्या चहानेच. दवाखान्यात पेशंटला लिक्वीड डाएट मध्ये चहा हा मेन्यू असतोच. प्रसंगी अशा पेशंटला बघायला आले की मागवा चहा. डोकं दुखतय, टेन्शन आलंय, अस्वस्थ होतयं जरा च्या घ्या बरं वाटल, तरतरी येईल. कुणाशी अबोला झाला, बोलण्याची सुरुवात कशी व कोणत्या कारणाने करायची ही विवंचना सहसा झाला का चहा? या प्रश्नाने दूर होणार. कुण्या परगावात जा, पाहुण्याकडे जा पहिला प्रश्न चहा घेणार? किंवा थांबा की च्या घेऊनच जा. असं बरचं नि बरच काही!  
     आपल्या आयुष्यातील स्वागत आणि निरोप हे बहुतकरुन चहानेच होतात हे विशेष. (काही अपवाद वगळता). किंबहुना, आपल्या आजूबाजूला काही सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार या शब्दाला समानार्थी व पर्यायी असा शब्द म्हणजे चहापानीअसं समीकरण झालयं. ही वेदना वेगळीच म्हणावी लागेल. येथे मात्र गोड चहाची चव बेचवच होणार, यात वाद नाही. ही बोचरी खंत मला वाटते.
     मी असंही पाहिल आहे की काही भागांत, एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ति मृत पावली की १२ दिवस चहा घेत नाहीत. म्हणजे गोड खात-पित नाहीत. व दिवसकार्याच्या १३ व्या दिवशी प्रथम तोंड गोड करण्यासाठी पहिल्यांदा चहा पिला जातो व दुःख सांडून या दुःखातून बाहेर पडायची ऊर्मी मिळते त्या चहातून.
     इतकचं नव्हे तर, कुणी एखाद्याच्या घरी गेलं व तासभर बसलं व तिथल्या घरच्यांनी चहा न देता नुसत्या पाण्यावरच आपला निरोप साजरा केला तर मनाला खुप नाराजी वाटते. तर काहींना हा प्रकार अपमानास्पद वाटतो. एवढा वेळ बसलो... एवढ आपुलकीनं बोललो... पण साधा चहासुध्दा विचारला नाही असा भाव मनात घर करुन जातोच. चहा आणि व्यक्तीं व्यक्तींमधील संवाद या दोन गोष्टी म्हणजे, पाण्यामध्ये विरघळणाऱ्या साखरे सारख्या. आणि या सुसंवादाच्या श्रेयाच निमित्त मात्र चहा बनतो.
      चहाची तलफ असणं, चहाची आवड असणं व चहाच व्यसन असणं या तिन्ही अगदी भिन्न गोष्टी आहेत असं मला वाटत. चहाची तलफयेण्यासाठी काळ नि वेळ काहीही लागत नाही. या प्रकारात मध्यरात्री २ वाजताही चहा घेतला जातो. पण याच एक वैशिष्ट्य म्हणजे, यांमध्ये अगदी एक घोटभर चहाही तलफ भागवून जातो. चहाची आवड असणं हेही एक वेगळया सुरातलं गाणं...जसं की मला चहाची आवड आहे. म्हणजे, सकाळी फ्रेश होण्यासाठी व सायंकाळी मूड बदलण्यासाठी १-१ कप प्रमाणबध्द घेतला जाणारा चहा आवडीच्या प्रकारात मोडतो. मी व माझ्यासारख्या अशा आवडीचे लोक जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी चहाचा पाहुणचार मुळीसुध्दा टाळत नाहीत. चहाच व्यसन म्हणजे अनारोग्याच्या खाईत लोटणारच. अतिचहा शेवटी वाईटच याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. नवीन-नवीन विद्यार्थी दशेत मला नकळत चहाच व्यसनच लागल होतं. इतकं की, मी कॅन्टीनमध्ये दिवसभरात १२ कप चहा घेतला होता...व त्याचा दुष्परिणाम माझ्या चेहऱ्यावर, हातापायावर उष्णतेचे पुरळ उठले. म्हणूनच, चहाची तलफ असावी, चहाची आवड असावी पण चहाच व्यसन नकोच अस माझ शुध्द अनुभवी मत आहे.
     कॅन्टीनवरुन आठवलं...कॅन्टीनचा चहा एक वेगळाच अनुभव देणारा. भलेही त्यात चहापत्ती, दूध, साखर यांच प्रमाण कसंही असेना पण मित्र मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये असा चहा घेण म्हणजे, एकमेकांची सुख, दुःखे वाटून घेऊन दुःखांना बायबाय करुन सुखांना वेलकम करणं!
     टपरीवरचा चहाही निराळाच. टपरीवरचा चहा घेण्यासाठीकंपनी देणारी व्यक्तिही राजी खुशी आपल्यासोबत असावी, कारण पांढरपेशा व्यक्ति सोबत का-कू करत टपरीवरचा चहा प्यायला मजाच येत नाही. थोडक्यात, टपरीवरचा चहा प्यायचा झाल्यास एकदम टपोरी बनायला पाहिजे. मुख्य म्हणजे, दुसरा फायदा, खिशाला कात्रीही कमी बसते. पुण्या-मुंबईसारख्या शहरांत कॅफे कॉफी डे अशी कल्पना जोमात आहे कारण, कॉफी मागवायची, नि हवा तितका वेळ त्या कॅफेमध्ये गप्पा मारत बसायच. पण कॉफी डेच अस का नाव बरं...कॅफे टी डेका नाही असा मला पडलेला प्रश्न. तसं कॉफीपेक्षा चहा हे आपल्या भारतीय पेयांच्या रांगेत प्रथम स्थानी जाऊन बसणारं पेय आहे असा माझा कयास आहे.
     माझ्या किचनमध्ये, चहाच भांड, कपबशी आणि चहा गाळायच गाळण यांवर माझ अगदी इतर भांड्यांकुंड्यांपेक्षा जरा जास्तच प्रेम आहे. कारण, मला चहा विशेष आवडतो. माझ्या नवऱ्याला चहाची विशेष आवड नाही. मग तो ऑफीसला गेला की मी १ वेळचा चहा २ वेळा बनवून पिते. म्हणजे, एका वेळी अर्धा कप असा. त्यामुळ, आरोग्याच्या दृष्टीनं आपसूकच माझ कमी प्रमाणात चहा पिण होत, आणि चहाची आवड मात्र मनोमन जोपासली जाते.
     हल्ली चहा सर्व्ह करताना, बशी देण्याची पध्दतच लुप्त होत आहे. नुसता कपच आणि तोही अर्धामुर्धा. पण मी माझ्या कपाटात बशा आवर्जून ठेवल्या आहेत...कारण गावाकडील पाहुण्यांना बशी लागतेच. चहा बशीतून पिताना सुर्र सुर्र असा आवाज करुन चहाची चव घेण्यातही एक वेगळीच मजा असते. कोणत्याही प्रकारचा सकाळ संध्याकाळचा नाश्ता आणि चहा हे दोघं पक्के दोस्त. शिरा, उप्पीट, पोहे, इडली, आंबोळी असा बेत झाला की जरा चहा टाका असं  फर्मान आपसूकच निघत. पण जेवणानंतरही चहा घेणारेही विरळेच.
     मी चहा घेत नाही. असं काही जण अभिमानाने सांगतात. हे का? ते कळत नाही कदाचित चहा म्हणजे आरोग्यास अहितकारकच असा त्यांचा समज असावा आणि अशा लोकांचा पाहुणचार करण म्हणजे बुचकळ्यात पडल्यासारखं होत. मग, करा लिंबूसरबत, कोकम, नाहीतर द्या कपभर दूध. ज्याची सर फक्कड अशा चहाला येतच नाही.
     चहाच्या नुसत्या सुगंधानेच किती प्रसन्न वाटत ते पहा. सकाळी वा संध्याकाळी काहींच्या घरातून चहाचा असा सुगंध एकत्र येतो, आणि सगळ वातावरण प्रफुल्लित करुन सोडतो. आलं घालुन केलेला, वेलदोडे टाकलेला, लिंबाची पान टाकलेला, तर कधी गवती चहा टाकून केलेला चहा. वा!  एकदम पुनर्जन्म मिळालाय असा फिल येतो. असा चहा पिल्यानं नव्हे, तर नुसत्या सुगंधानंही. चहाच्या चवींनाही नाना चवी आहेत. अतिगोड, मध्यम, कमी गोड असे. आणि त्यात भर म्हणजे वेलदोडे, लवंग, सुंठ, दालचिनी, काळी मिरी, जायफळ, असा चहाचा मसाला टाकून बनवलेला चहा तर एकदम फक्कड मेजवानी जणु! अशा चहाच्या सुगंधांची व चवीची खरी मजा अनुभवता येते ती, पावसाळ्यात व थंडीच्या दिवसांत...मग अशा प्रफुल्लित चहाला प्लेटभर गरमागरम भज्यांशिवाय मुळीच करमत नाही.
     सर्वसामान्य कुटुंबांत, विशेषतः नोकरदार वर्गात सकाळी नाश्त्याऐवजी चहा व त्यात बुडवून चपाती खाल्ली जाते. माझ्या घरी १२ महिने हेच Combination असतं. त्यात भर म्हणजे, आईच्या हातच्या भरपूर तेल लावून एकाखाली एक असे पदर सुटलेल्या, तवाभर पसरलेल्या गरमागरम चपात्या चहासोबत खायला मिळणं म्हणजे माझ भाग्यच!. माझ्या घरी चहासोबत चपाती हा मेनहिरो असतो व खारी,बटर, टोस्ट, बिस्कीटे हे साईड हिरो असतात. कारण, कधी कधी चहासुध्दा माणसांसारखा त्याच त्याच सहवासाला कंटाळतो म्हणून त्याला पण अशा बेकरी सहवासाचा Change ही मिळतो.
     मला आवडलेला चहा म्हणजे चेन्नईमधला. तिथे स्टीलच्या उभट ग्लासातून थोडीच साखर घालून, पण अगदी बासुंदीसारखा चहा मी पिला होता. चहा बनविणारा तर २ फूट उंचीवरुन ग्लासांमध्ये चहा ओतून चांगला मिक्स करुन देई. अमरावती शहरामध्येही खूप चवीचा चहा भेटतो. सोलापूरमध्ये मी दूध पावडर टाकलेला चांगला चहा बऱ्याचदा Taste केला आहे. आमच्या कोल्हापूरच्या चहाची तर बातच न्यारी...तसे आम्ही खरे रस्सा खवय्येलोक. पण शिरा-पोहे मिक्स किंवा वडापाव व सोबतीला टपरीवरचा काचेच्या ग्लासमधला कटिंग चहा यातही आम्ही तेवढेच कटिंग चहा पिवय्ये म्हणून समृध्द झालेलो आहोत!
    
     तर....अशा चहावरून आठवल, हा लेख लिहिता लिहिता माझ्याही चहाची वेळ झाली आहे आणि तुम्हाला एव्हाना कळलंच असेल की ही वेळ टाळून चालणार नाही...चहाच आधण ठेवलंय..त्याला ऊकळी येतेय...सोबत माझ्या मनातही, आता चहा घेत घेत हा लिहिलेला लेख वाचायचा म्हणून आनंदाची ऊकळी फुटतेय...
-      शैलजा खाडे-पाटील.

.................................................................................................................................


कुणालाही मानवेल असं पनवेल..

कुणालाही मानवेल असं हे पनवेल!
                                                                                                               - शैलजा खाडे-पाटील.

    जसा दसरा संपला तसे दिवाळीचे वेध लागले. धनत्रयोदशी उजाडली..लग्नानंतरची ही माझी पहिलीच दिवाळी, अन् ती साजरी करण्यासाठी किंबहुना, माझ्या नव्या नवेल्या संसाराची सुरुवात म्हणून मी कोल्हापूरहून पनवेलला पोहोचले...तसं माझ ऑफीस कोल्हापूरमध्ये आणि माझ्या नवऱ्याच पनवेलला. त्यामुळंच लग्न होऊनही, ७-८ महिनोंकी लंबी दर्दे जुदाई आम्ही सहन केली. पण या दिवाळीला, खऱ्या अर्थानं, I कडून We कडे असा माझा प्रवास सुरु झाला...पनवेल शहरापासून ६ कि.मी वर असणार नेरे हे डोंगरांच्या कुशीत वसलेलं छोटसं गाव. त्या गावानजीकच महालक्ष्मीनगर आपल्या स्वागतास सज्ज. तिथूनच माथेरानही सहज जाण्याजोग. महालक्ष्मीनगर डोळ्यांसमोर आलं की तिथल्या आठवणींची एक एक अशी पानं हळूहळू उलगडत जातात...
     तिथच फ्लॅट हा निवासी प्रकार मी पहिल्यांदा अनुभवला. मी मूळची कोल्हापूरची. सासर, माहेर, ऑफीस सगळं तिथच आणि मुख्य म्हणजे तिथली माझी घरं अगदी ऐसपैस, बागबगीचा असणारी व टुमदार. त्यामुळ फ्लॅट विषयी कुतुहल होतच. त्यातल राहणीमान, कुणाकडूनतरी ऐकलेलं किंवा पेपर-पुस्तकांत वाचलेलं...पण फ्लॅट मधील जगण्याच खरंखुर अवगतीकरण झालं ते पनवेलमधल्या महालक्ष्मीनगर मध्येच. एकत्र कुटुंबपध्दती ऱ्हास पावून फ्लॅट संस्कृती उदयाला आली ती मुळात एकाकी, स्वार्थ, अहंकार असे अवगुण घेउनच असा काहीजण टाहो फोडतात. पण मी अनुभवलेली इथली फ्लॅट संस्कृती या टाहोला छेद देणारी ठरली. याच पनवेलमध्ये माझ्या आयुष्याची 2nd Inning (लग्नानंतरच आयुष्य) सुरु झाली.
     तर, महालक्ष्मीनगरमध्ये एकसारख्या इमारती, अगदी एकसारखीच दारे, खिडक्या, रस्ते इ. पहिल्यांदा पाहिल्यावर जणु जुळी भांवंडच एकमेकांच्या हातात हात घालून ऊभी आहेत असा भास मला झाला. अन् माझ्या कोल्हापूरी गावरान मनाला थोडं बावरायलाच झालं. नवीन घर, नवीन संसार, सगळं कस अगदी स्वच्छ कोऱ्या पाटीसारखं..त्यामुळं जसं, नव्या करकरीत पाटीवर श्री गणेशा लिहावा आणि ते सुंदर अक्षर नजरेत, मनात साठवून ठेवाव अगदी तसचं इथल्या माझ्या दिवाळीच झालं...दिवाळी खूपच मजेत साजरी केली मनात साठवून ठेवण्याजोगी. जसा सण झाला, घरातल सामान लावून झाल तस माझ मन तळ्यात मळ्यात करायला  लागलं. मला माझ्या कोल्हापूरची हूरहूर लागली.अजिबातच करमेनास झालं.
      एक दिवस अचानक, दुपारी बेल वाजली, आणि मला कोण आनंद झाला म्हणून सांगू! कारण, माझा नवरा, आणि कचरेवाला, दुधवाला, पेपरवाला, ही दुपार सोडून येणारी ४ च माणसं. तर आमच्या शेजारीण मिसेस सिंग आल्या व अस्सल बिहारी बोलीत माझी चौकशी केली. माझ नवीन बारसही त्यांनी करुन टाकलं. कारण, माझ नाव शैलजा मध्ये श ऐवजी स आणि चा उच्चार ज्या असा न करता जा असा केला  (म्हणजे, उच्चारताना जोकर मधला ज वेगळा आणि जाई जुई मधला ज वेगळा असं). म्हणजेच सेलजा अस. त्यांच्याशी बोलताना माझंही तोडकं मोडकं हिंदी यावेळी चांगलच भाव खाऊन गेल. मग आमची यथासांग ओळख-पाळख झाली. हळूहळू शेजारधर्माच नुसत पालनच नव्हे तर पोषणही सुरु झाल. एकमेकींच्या पदार्थाची रेलचेल सुरू झाली. एकदा मी लोखंडी काळ्या तव्यात भाकरी बनवताना मिरच्या मागायला सिंग आंटी आल्या, आणि तेव्हाच तव्यातली भाकरी नेमकी फुगुन टुम्म झाली. अहो आश्चर्यम!!! या नजरेने त्या माझ्याकडे पाहतच राहील्या. मग मला कळलं ते अस की, त्यांच्याकडे फक्त गव्हाचे फुलकेच बनतात भाकरी हा प्रकार त्यांनी प्रथमच बघितला. तेव्हा मी त्यांना ताटातून भाकरी दिली,तर त्यांनी लगेच काजु, बदाम, मनुके इ. सुका मेवाच माझ्या हातात ठेवून दिला. किती हा दिलदारपणा!
      कधी आजारपण आलं, कसली मदत लागली तर त्या माझी आवर्जुन चौकशी करत. अगदी विश्वासान घरची चावीही माझ्याकडे ठेवून जात. बिहार राज्य म्हटलं की आपल्यासमोर सर्वसाधारण चित्र येत ते निरक्षरता, मागासलेपण, गरिबी, भ्रष्टाचारानं गांजलेल राज्य. पण, सिंग आंटीनी त्यांच्या प्रांजळ वागणुकीतून या प्रतिमेला तडा दिला. त्यांच्यासारखे अनेकजण जीव लावणारे लोक तिथं मला भेटले, आणि माझ्या मनात कायमचे घर करुन गेले.
      मी व माझा नवरा आम्हा दोघांनाही व्यायामाशिवाय चैन पडायचा नाही. (six pack zero figure चा हट्ट नाही बर का!)  विशेष म्हणजे महालक्ष्मीनगरमध्ये फिरण्यासाठी, व्यायामासाठी खुप सुंदर मोठ्ठाली बाग होती. आम्ही दोघंही या बागेत न चुकता रोज जाऊ लागलो. त्या बागेच वैशिष्टय म्हणजे बागेभोवती मोठी-मोठी हिरवीगार बहरलेली शेती होती आणि एक विहिरही. या विहिरीला १२ महिने झऱ्याच पाणी असे. बागेच्या मध्यभागी २ मोठी तळी होती.
      त्यामध्ये छोटी कासवं, इटुकले मासे खेळत असत. आमच्या कोल्हापूर मध्ये शिळी भाकरी वा चपाती उरली तर, घाला गुरा- ढोरांना. पण इथ आम्ही शिळी भाकरी वा चपाती किंवा ब्रेडचे तुकडे या तळ्यातल्या कासवांना, माशांना घालत असू. सभोवार शेती असल्यान अगदी नुकतीच खुडलेली हिरवीगार, ताजी भाजी स्वस्त दरात तिथले शेतकरी देत. खरचं, शेतकऱ्यासारखा दिलदार माणूस या जगात सापडणार नाही. अशी ताजी काळी वांगी, पालक, मेथी, खरबूज, भेंडी, बोरं, घोसाळी नेहमी माझ्या किचनमध्ये येऊ जाऊ लागले. घोसाळ्यांची भजीही मी इथेच बनवायला शिकले.
 तर अशा सुंदर बागेत गेल्यावर आदरणीय कवी बा.सी. मर्ढेकरांची कविता माझ्या ओठांवर यायची...
किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो,
किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो...
खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच...
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखाची तीच!
        पनवेल खर तर मुंबईपासून जवळ. पण येतं रायगड जिल्ह्यात म्हणजे कोकणात. त्यामुळं इथल्या बोलीभाषेलाही खास कोकणी लयीचा ताल. येथील मंदिरांच्या अधिक संख्येमुळं मंदिरांचं शहर अशी पनवेलची ओळख आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातील गणेश जयंती इथं खूप उत्साहान साजरी केली जाते. त्यालाच माघी गणेशोत्सव बोलतात हा उत्सव इथला खास! या उत्सवाच्या मिरवणुकीत मुली, बायका हौसेनं नाचतात हेही पहिल्यांदा पाहिल मी. अन् अशा मिरवणुकीतच मलाही नाचायची निरंकुश संधी मिळाली.  नवरात्रामध्ये तर आमचा दांडीया आणि गरबाचा धुमधडाका चालू असायचा.
     माझी मॉल या प्रकाराशी प्रथमच ओळख झाली ती पनवेलमध्येच. नाहीतर, कोल्हापूरमध्ये महाद्वार रोड, गंगावेस, लक्ष्मीपुरी, तर कधी कपिलतीर्थ मार्केट मध्ये गेलं की होलसेल बाजार भरुन आणायचा. (अलीकडेच रंकाळ्यावर डी मार्ट झालय म्हणा! ) पण इथ नवऱ्याला कंपनीतर्फे फूड कार्ड मिळत असल्यानं, आम्ही मॉलमध्येच खरेदी करत असू. पहिल्यांदा गेले तेव्हा काय घेऊ नी काय नको असं झालं. माझ्या हॉलमध्ये शो च्या वस्तूंची एकच गर्दी झाली. तर, किचनमध्ये कपाटात भांड्यांची ढकलाढकली होऊ लागली. एवढी भांडी जास्त झाली. नको त्या विनागरजेच्या वस्तूंनी मन विटायला लागलं. परिणामी मला, मॉल मधल्या खरेदीमध्ये काहीही स्वारस्य राहील नाही. अशा खरेदीबाबतीत मी मनापासून निगरगट्ट बनले. तसही असं कितीसं लागत माणसाला जगायला...आपल्या हव्यासापायी गरजेच्या गोष्टींवर काजळी चढते आणि नको त्या गोष्टी लखलखायला लागतात ज्यांचा प्रकाश इतका प्रखर असतो की, त्या प्रकाशात आपले डोळे दिपून एव्हाना, आपण आपल्याकडेच पहायच विसरुन जातो. मग मी निर्धार केला की मॉल मध्ये पाऊल टाकायचं ते निर्मोही मनानचं!
      एरवी संध्याकाळी, पनवेलच्या रस्त्यांवर उगाचच न्याहाळत फेरफटका मारायला मला आवडायचं. एका पावलावर रसरशीत फणसांचे गरे तर दुसऱ्या पावलावर ऊसाचा ताजा रस...हिरव्यागार कलिंगडांचे ढीगच्या ढीग, पिवळ्याधमक आंब्यांची रास... कोवळ्या लुसलुशीत काकड्या, काळ्या, हिरव्या द्राक्षांचे घड, बोंबील, सुरमई, खेकड्यांचे वाटे, ताजी मक्याची कणसं तीही कधी उकडलेली तर कधी मस्तपैकी तिखट मीठ, लिंबू लावलेली, संत्री मोसंबी ज्यूसचे स्टॉल्स...मध्येच एखादा पाणीपुरी वाला अथवा भेळवाला तर कोपऱ्या-कोपऱ्यावर खेडूत लोकं हिरवीगार ताज्या भाज्यांचे वाटे लावून विकायला बसलेले असायचे. तर फिरताना असा एक वेगळाच माहोल मला अनुभवायला मिळायचा. माणसांचा व निसर्गाचा हा अभूतपूर्व पसारा पाहून वाटायचं, निसर्ग किती भरभरुन देत असतो माणसाला...आणि माणूसही ते घेत असतो. तो मिळालेलं स्वतःच्या पोटात ढकलून इतरांच्या पोटालाही द्यायच काम करीत असतो. मात्र, या आवर्तनाच्या बाहेर माणसाने न जाणेच रास्त. कारण, निसर्गाला अमर्याद ओरबाडलं तर तोही रुसतोच की.
     या बाजारांमध्ये खरवीज (खरवस) हा पळसाच्या पानाच्या द्रोणातून, तोही विकत मिळणारा मी इथे पहिल्यांदाच पाहिला. आमच्या कोल्हापूर मध्ये म्हैस किंवा गाय व्याली म्हणजे, तिच्या ताज्या चिकाच वाटप गल्लोगल्ली वाटायला एकच धावपळ सुरु व्हायची. ज्याच्यापासुन गूळ, वेलदोडे, व नकळत मीठाचा खडा टाकून खरवीजाच्या वड्या, नासकवणी, खरवीजाचा खिस असे एकदम चवदार पदार्थ बनवले जात. असो. पनवेलमध्ये असं बाजाराच चित्र हे ग्राहक व विक्रेता यांच्यातलं प्रवाही व सहजसंवादी नात अधोरेखित करणारा असायच. ज्यामध्ये परस्परांना जोखण्याच्या स्पर्धेचा अर्विभावही कधी मी पाहिला नाही.
     माणूस नावाचा प्राणी हॉटेलमध्ये गेला की घरच्या सात्विक चवीच अन्न चाचपत राहतो, व घरी मात्र हॉटेलच्या चमचमीत अन्नाच्या चवीचं अनुकरण करीत बसतो. मी आणि माझ्या नवऱ्यान ही अस्वीकारार्ह बाब कधीच केली नाही. पनवेलमधलं उत्सव हे हॉटेल आमच खास. त्यानंतर नंबर लागायचा तो शबरीनीलकमलचा. एखादा खास उत्सव असला की आम्हाला उत्सव शिवाय करमायच नाही. म्हणजे आम्ही अशा Occasion ला उत्सव हॉटेल मध्ये जात असू. उत्सवमध्ये नवरत्न कुर्मा, शबरीमध्ये डोसा व नीलकमल मधलं व्हेज कोल्हापुरी यांची चव अजुनही माझ्या जीभेवर रेंगाळतीय.  एकदा उत्सव मध्ये आम्ही जेवण करीत असताना, आमच्या बाजूच्याच टेबलला एक जोडप व त्यांचा छोटा मुलगा असं त्रिकोणी कुंटुब बसलेल होतं. एरवी, Hard drink पिण्यासाठी वेगळी सोय असताना तो माणूस त्याच्या मुला व बायको समोरच ड्रींक करीत बसला होता. मग त्याच पाहून मुलगाही अजाणतेपणाने त्या ड्रींकचा हट्ट करु लागला. शेवटी तो मुलगा रडू लागला. तो माणूस बोलला बेटा ये गंदा है, नई पीने का’. यावर तो मुलगाही लगेच React झाला. ये गंदा है ये,  आप पी रहे हो तो, आप भी गंदे हो गये ना’? यावर तो माणूस निरुत्तर झाला व चपापून त्यानं आमच्याकडं पाहिल, आपल्या कुटुंबाच असं ओंगळवाण प्रदर्शन त्याला पचलं नसल्याचं, अन् साधा जेवणाचा आस्वाद घेतानाही स्वतःची सद्सद् विवेकबुध्दी गहाण टाकल्याचे भाव मला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसले. आधी  मी कसं सगळ Goody Goody  लिहील...पण वरील प्रसंगामुळं थोडा Twist मिळाला ना तुम्हालाही वाचायला!
     मुंबई, ठाण्याची जीवनवाहिनी ट्रेनपनवेल मधुनही सुटतात. पनवेलच रेल्वेस्थानक अतिशय स्वच्छ व सुटसुटीत. आम्ही वाशी, कोपरखैरणे, CST, ठाण्याला ट्रेनमधून प्रवास करायचो. ट्रेनमधला अनुभव हा तसा लिखाणाचा मोठा आणि वेगळा विषय असल्यानं, त्याबद्दल इथ आटोपशीरच मांडलेल बरं. तर, ट्रेनन मला वाशीला जायला खूपच आवडायच कारण, जाताना मला चिखलमाती, पाणी व छोट्या झुडूपांनी व्यापलेल्या खाड्या बघायला मिळायच्या. ट्रेनच्या बुजबुजटातून बाहेर पडलं की, प्रत्येकजण  शरीरानं आपआपल्या परिघात मग्न असलेला, मात्र मनानं विचारांच्या समुद्रात डुंबत, पोहत, गटांगळ्या खाणारा.  अशी कित्येक जणांची लाटच्या लाट मला दिसे. वाशीचा रघुलीला मॉल माझ फेव्हरेट ठिकाण! आधी नमुद केल्याप्रमाण आम्ही खुपदा Window Shopping करायचो बाकी एखाद दुसरी खरेदी. ट्रेननं वाशी स्टेशनवर उतरल्यावर उसासे टाकण्याऐवजी, दीर्घ श्वास घेणे मी पसंत करायचे. कारण तिथली मोकळी स्वच्छ जागा, आटोपशीरपणा, खाण्या-पिण्याची व, निवांत बसण्याची सोय हे सर्व मला स्तिमित करुन सोडायच. शिवाय, तिथल्या दगडी फरशांवर अनवाणी पायाने चालण्याचा मोह मला उगाचच डिवचायचा.
     एकदा वाशीहून फिरुन परत पनवेलला येताना, घाई-गडबडीनं साध्या डब्याच तिकिट असताना  मी चुकुन फर्स्ट क्लासच्या डब्यात चढले. आणि नेमक्या त्याच डब्यात तिकिट चेकर मॅडम चढल्या. मला त्यांनी पुढच्या स्टॉपला उतरवलं व माझ्याकडे दंडाचे पैसे मागू लागल्या. रात्री ९ वाजून गेलेले. पण माझा मोबाईल, पर्स माझ्या नवऱ्याकडचं राहिल की जो जेन्टस डब्यात चढलेला. मी विनंती करुन चेकरच्या असिस्टंटच्या फोनवरुन पतिराजांना फोन केला व ते मला परत मागे न्यायला आले. दुर्देवाने नेमकं आम्ही वाशीमध्ये काहीतरी खरेदी केल्याने आमच्याकडे दंडाचे पैसे देण्याइतपत ही रक्कम शिल्लक नव्हती. 
     चेकर मॅडमना मी माझ गाऱ्हाण पटवून द्यायचा खूप प्रयत्न केला. मीही नियमांचे पालन करणारी मुलगी आहे, मी मुद्दाम नाही तर चुकून घाईत फर्स्ट क्लासच्या डब्यात चढले, वॉलेट, पर्स सगळं दाखवल व दंडाची रक्कम जवळ नसल्याच सांगितल, इ. इ.  पण बया काही ऐकायलाच तयार नाही. तिच्यातली सरकारी रग जास्तच आग ओकू लागली. ज्यामध्ये आम्ही सामान्य लोक होरपळून जात असतो. मग माझ्यातली  सुप्त अवस्थेतली प्रतिशक्ती  जागी झाली...आणि पटाकदिशी मी तीचा हातच पकडला. चला माझ्यासोबत घरी चला तिथे पैसे मिळतील असे मी ठामपणे बोलले.  तशी ती चपापली. मग मीही लोकशाहीशी तडजोड करायचीच नाही असा निर्धार केला. मग मॅडम नरमल्या. आमच्याकडे ऑटोपुरते पैसे ठेऊन बाकीचे सगळे तिने काढून घेतले. इथे मी लाच दिली किंवा त्यांनी ती घेतली असा अर्थ होतोच असं नाही. कारण वारं येईल तशी पाठ फिरवणं कधी कधी त्या त्या काळाची गरज असते, तरच आपण नीट चालू शकतो. इथे परिस्थितीने नियमांवर कडी केली की जी स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
     कालांतराने, माझ्या नवऱ्याच कामाच ठिकाण बदललं. त्यामुळं जेव्हा मी पनवेल सोडलं तेव्हा मन नाराज झालं. तिथल्या या अधिकतम गोड आठवणींचं स्फुल्लिंग सदा चेतत राहणारं ठरल. तिथल्या माणसांच्या सोबतींच, भावनांच, विचारांच गारुड आजही माझ्यावर कायम आहे. माहेरवाशीण सासरी परत जाताना तिचा एक पाय आत नि एक बाहेर राहतो तशीच माझी अवस्था हे पनवेल...महालक्ष्मीनगर सोडताना झाली. इथे येताना बावरलेपणाचंपांघरुण घेऊन आलेले मी जाताना मात्र खळाळत्या प्रवाहा सारखी इथल्या आठवणीं सोबत घेऊन आले. आयुष्यात संक्रमण ठरलेलचं असतं, म्हणजे काहीतरी ओलांडून जावच लागतं. मग हा संकेत मी तरी कसा मोडणार बर?  पण माझ्याकडून एक शाश्वती तुम्हाला नक्की मिळणार ती हीच की, कुणालाही मानवेल असं शहर पनवेल! एवढ भरभरुन लिहुनही पनवेलमधल्या विचारांचा कल्लोळ काही थांबेना म्हणूनच अशा वेळी, आदरणीय बालकवींच्या ओळी ओठांवर येतायत....
येथे नाही तेथे नाही .......
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

                                                                                         शैलजा खाडे-पाटील.
...................................................................................................................