Saturday 26 May 2018

'बाबा'...एक आंतरिक ओढ!

बाबा...
                                                             शैलजा खाडे-पाटील.

     
     तशी ती संध्याकाळही रोजचीच संध्याकाळहोती. फार काही विशेष घडलं न्हवत. फक्त पावसाची एक सर नुकतीच येऊन गेली होती कारण तो मे महिन्यातल्या आम्रसरींचा मोसम होता. पावसानंतर आभाळ एकदम लख्ख झालं होत. तापल्या भूमीची तृष्णा भागवुन पाऊस तर निघुन गेलेला होता पण, धरणीला पुन्हा पुन्हा त्याचीच ओढ लागलेली होती. जसं हे पावसाच व धरेच नातं, तसच मानवी नात्यांमधल्या मनालाही कुणाची ना कुणाची ओढ लागलेली असते. मग ते नात प्रियकर-प्रेयसीच असो, आई-मुलाच असो, नवरा-बायकोच असो, मित्रत्वाच असो नाहीतर...नाहीतर...? फक्त उदरात वाढवुन त्याला जन्म न दिल्यामुळे नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या त्या बापआणि लेकाच असो! ओढ ही दोन्ही बाजूंनी राहिली आणि ती सुध्दा शुध्द अंतःकरणातुन असेल तरच त्या नात्यामधल्या प्रेमाला, मायेला, आपुलकीला, काळजीला अर्थ असतो.
      पाऊस पडुन गेल्यावर निसर्गाची मरगळ तर निघुन जाते तो पल्लवीत होतो. पण माणसाच्या बाबतीत अस घडतच अस नाही. असाच पाऊस पडुन गेल्यानंतर... पिकलेल्या पापण्यांखालच्या सुरुकुतलेल्या डोळ्यांवरचा धुरकट असा जडशीर चश्मा थरथरत्या हाताने बाबाने काढला. तो रुमालाने पुसला, व पुन्हा डोळ्यांवर चढवुन पावसानंतरच्या कुठे कुठे लख्ख पांढऱ्याशुभ्र व मध्येच सांजवातीकडे कललेल्या अशा पिवळसर तांबुस आभाळाकडे तो पाहु लागला. तशी त्याने त्याच्या आय़ुष्यात अशी खुप आभाळं पाहिली होती. सुरुवातीला अर्धांगिनीच्या साथीने, व नंतर मुलाच्या साथीने. आता त्याला असच आभाळ त्याच्या एकुलत्या एक नातवाच्या साथीने पहायची इच्छा उरली होती पण, ती काही केल्या पुर्ण होत न्हवती. स्वतःच्या रक्तामासाच्या जीवाला..मुलालाच पाहुन त्याला कित्येक वर्षे लोटली होती. आता फक्त ओळख उरली होती ती लेकाच्या आवाजाचीच..तोही आवाज एखाद-दुसऱ्या फोनवरुन ४-५ महिन्यांतुन एकदाच त्याच्या कानावर पडायचा. नातवाला पहाव, भेटावं अशी मनोमन इच्छा असुनही बाबा काहीच करु शकत न्हवता. ६ वर्षांपुर्वीच अमेरिकेत जन्मलेल्या त्याच्या  नातवाला पहायला जायच म्हणुन बाबाने पासपोर्ट, व्हीसाची सगळी तयारी केली पण...सुनबाईं व लेकाने थोड्या दिवसांत आम्हीच तिकडे येतो असे सांगुन बाबा अमेरिकेला न जाता आपल्या घरातच  राहिला. जिथं दुधाचं भांडचं रितं असेल तिथं त्या दुधावरच्या साय़ीची अपेक्षा तरी काय करणार?  आम्हीच येतो..तुम्ही नका येऊ हे गेली कित्येक वर्षे ऐकुन, ऐकुन  त्याला आता एकटेपणाखायला ऊठु लागला. हळुहळु बाबाला आता एकटेपणाची सवयच झाली होती..घरातील शांतता आणि तो रोज बागेत ज्या बाकड्यावर बसत असे ते बाकडे हेच काय ते त्याचे सखे सोबती असायचे.

     आजोबा..एक मोगऱ्याचा गजरा घ्या की फक्त १० रुपयेला एक आहे..घ्या ..या आवाजाने बाबाची आभाळाकडे एकटक पहायची तंद्री भंगली. पाहतो तो समोर एक ९-१० वर्षांचा सावळासा मुलगा उभा होता. त्याच्या हातामध्ये पांढऱ्याशुभ्र व सुवासिक अशा मोगऱ्याच्या फुलांचे गजरे आणि लाल-गुलाबी-पिवळी-पांढरी अशी विविध रंगांची सुंदर व मोहक अशी फुले होती. तेल-कंगवा नसलेले विस्कटलेले डोक्याचे केस..खोलवर गेलेले बारीक डोळे..कोरडे पडलेले ओठ..हाता-पायाची झालेली काडी.. अर्धी मुर्धी मळकटलेली, खिसा फाटलेली चड्डी व तांबुस किंवा आधी तो पांढरा असावा व नंतर त्यावर मळाच किटान चढुन मग तो तांबुस झाला असावा असा फाटक्या कॉलरचा आणि तुटक्या बटणाचा शर्ट घातलेला तो मुलगा बाबाला मोगऱ्याचा गजरा विकत घेण्यासाठी मनवत होता. अरे, बाळ मी हा गजरा घेऊन काय करु? नकोय बाबा मला जा तुबाबा त्या मुलाला समजुतीच्या सुरात बोलला.अहो, आजोबा, ह्यो मोगऱ्याचा गजरा घ्या नि आज्जीला द्या तिला आज तुम्ही बागेत नाही ना आणलसा फिरायला मग घरी गेल्यावर ह्यो गजरा तिला केसांत घालायला द्या ती लय खुष होईल बगा.तो मुलगा मोठ्या आशेने बाबाला बोलला. अरे वेड्या ते आभाळ पाहिलस? आज्जी तर त्या आभाळात केव्हांची लपुन बसलीय..मला रोज पाहते ती..कुणाला देऊ रे गजरा मी?  जा बाळ तु.” बाबा आभाळाकडे पाणावलेल्या नजरेने पाहतच त्या मुलाला  बोलला. बाबाचे हे बोल ऐकुन गजरे विकणाऱ्या त्या पोराला काय कळायच ते कळल आणि मान खाली घालुन नाराज मनाने तो पुढे चालु लागला.

      आधीच बोट-बोटभर खोल गेलेले डोळे त्यात भर म्हणजे त्याचा तो पडलेला, निराश चेहरा   पाहुन बाबाच्या मनात एक वेगळीच कालवाकालव झाली. त्याने त्याला आवाज दिला व मोठ्या आनंदाने त्याच्याकडुन गजरा विकत घेतला. त्या मुलाने दहाची नोट खिशात घातली नि जाम खुषीत येऊन उंच उड्या मारतच तो पुढच्या विक्रीला निघुन गेला. बाबा त्या पाठमोऱ्या पोराकडे पाहत राहिला व त्याच मन समाधानाने भरुन गेलं. त्यानंतर बाबा बराच वेळ त्या मोहक गजऱ्याकडे पाहत राहिला. त्या गजऱ्यातील फुलांच्या प्रत्येक पाकळी-पाकळीत त्याला तिचा चेहरा दिसु लागला. कित्येक वेळेला आपल्या अर्धांगिनीच्या सुखद आठवणींमध्ये बाबा रमुन जायचा. पण वेळेच्या व नशिबाच्या पुढे कुणाच काहीच चालत नाही. नियतीनं आयुष्याच्या जोडीदाराला अकालीच हिरावुन नेल. त्याला तो तरी काय करणार?  ‘तीहोती तेव्हा घराला घरपणं होतं. घरातल्या प्रत्येक वस्तुं-वस्तुंमध्ये जीवहोता. खरतरं, आयुष्याच्या सांजवेळीच बायकोची म्हणजेच जीवनाच्या जोडीदाराची खरी गरज असते हे बऱ्याच पुरुषांना फार वेळानं कळतं. तस बाबा ने हे वास्तव स्वीकारलं होत म्हणा!  कारण त्याने तिला नेहमीच भरभरुन प्रेम दिलं होत. पण जसा हीकडे मुलगा अमेरिकेत मोठ्ठाल्या कंपनीत रुजु झाला तसा तिने जीव झुरणीला टाकला. वारंवार आजारपणातुन ती ऊठुच शकली नाही व शेवटी पोटच्या गोळ्याची भेट न होताच तिच्या आयुष्याचा दिवा मालवला. त्या धक्क्यातुन बाबानं कसबसं स्वःताला सावरलं होतं. तसा बाबा मनाने कणखर होता.

     पावसानंतरचा मंद वाहणारा गार वारा बाबाच्या मनालाही थंडावा देत होता. अशा  हेलावणाऱ्या वाऱ्याने बाबाच्या अंगावर २-४ झाडाची पाने पडलीत आणि इतका वेळ नेहमीच्या बाकड्यावर बागेत बसलेला बाबा आठवणींच्या वळणावरुन पुन्हा आपल्या रोजच्याच मार्गाला आला. कधी काळी घेतलेली चप्पल बाबाने पायात सरकवली..तशी रोजची बायका-मुलांची-नातवांची धावपळ असती तर त्यांच्या गोतावळ्यात धावता धावता चप्पल तर कधीच झिजुन गेली असती. पण हीथे तर सगळा पोकळ पसाराच होता. त्यामुळे चपलापासुन ते चश्मा, पैशांच पाकिट, मनगटी घड्याळ अशा कित्येक छोट्या-मोठ्या गोष्टी बाबा कित्येक वर्षे वापरत आला होता. हळुहळु सुर्य कलला तसा बाबा सावकाश पावले टाकत घराच्या दिशेने निघाला. आता तर रस्त्याच्या खाचखळग्यांचा अंदाजही घ्यायची त्याला गरज न्हवती कारण डोळे मिटुनही तो त्या रस्त्याने घरी जाऊ शकत होता एवढा तो रस्ताही त्याचा सखा बनला होता.
     तशी त्याला घाई करायची गरजच न्हवती कारण घरी कुणीतरी वाट पाहणारं असतं तेव्हा माणुस वेड्या आशेन..ओढीनं..आपल्या पिलांना बिलगण्यासाठी..वगैरे घरी जायची
घाई करीत असतो. पण बाबाच्या बाबतीत यांपैकी कुठलीच गोष्ट घडणार नसल्याने तो अगदी निवांत मनाने चालला होता. एव्हाना बाबा आणि त्याचा एकटेपणा आजुबाजूच्या लोकांना चांगलाच परिचित झाला होता. त्यामुळेच, बागेतुन घरी जाताना कोपऱ्यावरची भाजीवाली, इस्त्रीवाला, दुकानदार, सलुनवाला असे बरेच नि बरेच रोजच्याच गरजेचे लोक बाबाला आवर्जुन बोलवत असत.
      बाबा आपला सगळ्यांशी काय?  कस काय? वगैरेचा संवाद साधत हळुहळु नेहमीच्या दादु चहावाल्याच्या टपरीवर येऊन थांबला. अरे दादु आज थोडीशी साखर टाकच चहात. तोंडाला थोडा गोडवा येऊदे रेदादुच्या टपरीवरच्या खुर्चीवरची धुळ झटकत, त्यावर बसतच बाबा दादुला बोलला. अरे बाबा आसल काय सांगु नगो मला. उद्या तुझी साखर वाढली नि दवाखाना लागला की माझ्या नावानं सगळी बोंबा मारत्याल...असे बोलत बाबाकडे पाहत दादुने रोजच्याप्रमाणे विनासाखरेचा मस्त वेलची, आले टाकलेला स्पेशल दुधाचा कटिंग चहा बाबाला देऊ केला पण त्याला काय वाटले कुणास ठाऊक पुन्हा हसत हसतच त्याने त्या चहात वरुनच दोन चिमटी साखर टाकली. हे बाबाने पाहिले. अरे दादु रक्ताच्या माणसांनी दूर केल्याने या शरीरात साखर वाढुन नको तेवढा गोडवा आलाय आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या आयुष्यात गोडवा नसतानाही तुझ्यासारख्या पावलोपावली जोडलेल्या माणसांच्या प्रेमाने माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने गोडवा टिकुन आहे.. म्हणुनच तु उगाच नाही दोन चिमटी का होईना वरुन चहात साखर टाकली, कळलं?” असे दादुला बोलतच बाबाने चहाचा घुटका घेतला. एरवी चहा प्यायला असा कितीसा वेळ लागतो माणसाला?  २-४ मिनीटं पण बाबा मात्र कटिंग चहा घ्यायला १०-१५ मिनीटं सहज लावायचा. सहज म्हणण्यापेक्षा मुद्दामच कारण बाबाकडे तर वेळेचंन संपणार गाठोडच होत तो टपरीवर येणाऱ्या प्रत्येकासोबत पाऊस पाण्याच्या गप्पा मारतच चहा घेत असे. सुर्य पुर्ण डुबला...दिवेलागणीची वेळ झाली..तसा बाबा दादुचा निरोप घेऊन चालता झाला.

     घरी आल्यावर बाबाने त्या पोराकडुन विकत घेतलेला मोगऱ्याचा गजरा देवघरातल्या देवीला वाहिला. दिवा लावुन त्याने डाळ-भाताचा कुकर चढवला. कामाच्या बाबतीत बाबा थोडातरी स्वावलंबी होताच. तीगेली तशा कुकर लावण्यापासुन छोट्या रोट्या बनविणे ते चहापाणी, कपडे, भांडी अशा छोट्या-मोठ्या गोष्टी बाबाच करीत असे. तस बाबाच घर मोठ व प्रशस्त होतं देवघर, बैठकीची खोली, किचन, दोन बेडरुम्स, छोटसं अंगण, त्या अंगणात बाबाने फुलवलेली फुलझाडांची व फळझाडांची बाग वगैरे..सरकारी वरिष्ठ लिपिक म्हणुन बाबा निवृत्त झाला होता. आजवर त्याने त्याची कामावरची सेवा चोख व प्रामाणिकपणे बजावली होती. मुलगा, सुन, नातू यांना काही कमी पडु नये म्हणुनच बाबाने स्वतःच्या प्रामाणिकपणे पार पाडलेल्या कष्टातुन आर्थिक बाबतीत मोठी तजवीज करुन ठेवली होती. पण निळाशार, शांत, कधी उसळता व रुपेरी वाळुंच्या किनाऱ्याचा समुद्र कसा लोभस व मनमोहक वाटतो पण त्याच पाणी मात्र माणसाची तहान भागवु शकत नाही तसच काहीतरी बाबाने साठवुन ठेवलेल्या पैसा, सुबत्ता व संपत्तीच झाल होत. बाबाकडे तर सगळं सगळं होत पण त्याचा उपभोग करुन घेणारी जीवाभावाची माणसेच त्याच्यापाशी न्हवती.

     कुकरची तिसरी शिट्टी होते तोवर दारावरची बेल वाजली. बाबाने दार उघडले तोच अरे दोस्ता कधी आलास तु? अरे ओवीने आज सुंदर तलावाकडे फिरायला जायचा हट्ट धरला मग त्या पिटुकलीला तिकडेच घेऊन गेलो रे आज. त्यामुळे नाही येता आल मला बागेत..आणि आता ती परत मुंबईला जाईतोवर जमणारच नाहीय..बाबाचे शेजारी थत्ते आजोबा बोलले ते आज खुपच खुशीत होते. खुप नशीबवान आहेस तु रे..नातीसोबत चांगला रमतोसअसे बोलत बाबाच्या व त्यांच्या नेहमीच्या पुर्वीच्या ऑफिसातल्या, कॉलेजातल्या वगैरे गप्पा सुरु झाल्या. गप्पा मारतानाच मासे पकडायचा विषय निघाला आणि बाबाला मात्र आज सुरमई खायचा मोह झाला. डाळ भाताचा बेत उद्यावर ढकलुन लगेच बाबाने नाक्यावरच्या हॉटेलातुन खमंग सुरमई पार्सल मागवली. थत्ते आजोबांच्या मैत्रीमुळे बाबाला स्वतःच्या एकटेपणाचा विसर पडत असे.
      दोघेही चांगलेच रंगात आले...सुरमईच्या पहिल्याच घासाला बाबाला तीची आठवण झाली. कारण बायकोच्या हातची खमंग सुरमई ही बाबाची सगळ्यात आवडती डीश होती. तुला सांगतो मित्रा आमची हीअश्शी चवदार सुरमई बनवायची ना की खाताना स्वर्गसुख मिळायच रे..असे बोलत बाबाने एक मोठ्ठा आवंढा गिळला. तोवर त्याला जोराचा ठसका लागला. थत्त्यांनी त्याला पाणी दिले. बाबाने घेतलेला हातचा घास कधीच गळुन पडला. बसल्या जागीच बाबाच्या थकलेल्या डोळ्यांतुन घळघळ पाणी वाहु लागले..नंतर तो अक्षरशः लहान पोरासारखा रडु लागला. ते पाहुन थत्ते आजोबाही थिजले व त्यांचेही डोळे भरुन आले.           
     अरे मित्रा जाऊदे ना अशी किती वर्षे तु आठवणींच्या जंजाळात गुंतवुन स्वतःला त्रास करुन घेणार आहेस? हे जग किती सुंदर आहे बघ तरी.. तु प्रयत्न करतोसच ना रे या एकटेपणातुन मोकळेपणाने जगायचा...प्रत्येकालाच हवं ते हवं तस मिळालं असतं तर सुखाची किंमत कुणालाच कळली नसती. जे नशीबाचे भोग आहेत ते भोगावेच लागतात. या जगात कुणीच अमृत पिऊन आलेला नाहीय..म्हातारपणाचा शाप प्रत्येकालाच आहे पण नियतीचा हा शाप आपण वरदान कसा बनवायचा ते आपल्याच हातात आहे. आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. प्लीज आटप जेव लवकरथत्ते आजोबांचे हे शब्द आता कित्येक वर्षे बाबाला चांगलेच तोंडपाठ झाले होते. तरीही बाबाला हे ऐकुन थोड बरं वाटल व जेवणं आटपुन दोघेही शतपावली करायला बाहेर पडले.
     त्या संध्याकाळी पावसाची सर येऊन गेल्यामुळे, हवेत बोचरा असा गारवा पसरलेला होता. त्या गारव्यात बाबा आणि थत्ते आजोबा दोघेही हळुहळु शतपावली करीत नाक्यावर आले.
     नाक्याचा रस्ता हा एका जुनाट पुलाखालुन जात असे. दोघेही घरी जाण्यासाठी पुलाखालुन वळले तोच मोगऱ्याच्या मंद, सुवासिक व मोहक वासाने बाबाची पावले आपोआप थिजली. चश्मा नीट पुसुन पाहतो तो पुलाखालच्या डाव्या कोपऱ्यात एक ९-१० वर्षांचा मुलगा फुलांचे गजरे विणत बसला होता. एवढ्या अंधुकशा प्रकाशात बारीक सुईने मोगरा-अबोलीचे गजरे तो मुलगा मोठ्या कसबीने व भरभर विणत होता. बाबाला राहावलेच नाही. तो सावकाश त्या मुलापाशी गेला व त्याला जवळुन न्याहाळुन पाहिले तर मघा सायंकाळी बागेत, ज्या मुलाकडुन बाबाने मोगऱ्याचा गजरा घेतला होता, तो तोच मुलगा होता. त्याचा अवतार खुपच गबाळा असला तरी त्या अंधाऱ्या रात्रीच्या अंधुकशा प्रकाशातही त्याच्या चेहऱ्यावरचे एक विशिष्ट तेज बाबाच्या नजरेआड लपले नाही.अरे, तु मघाशी बागेत मला गजरा विकत घ्यायला भाग पाडल तोच ना रे तु?” बाबाने खात्रीशीर सुरातच त्याला विचारले. तसे इतका वेळ तल्लीन होऊन गजरे विणणाऱ्या त्या मुलाने वर पाहिले. अरे, आजोबा व्हय मीच त्यो. मघा तुम्हाला गजरा इकलेला..आता उद्याच्या धंद्याची तयारी करतोय..जरा टायमाने रातच्याला ह्या फुलांचे गजरे, हार, माळा तयार केल्या की दुसऱ्या दिशी लय काळ टिकत्याल बघामुलगा हलकेच स्मितहास्य करीत बोलला.

       अरे बाळ, इतक्या रात्री अशा बोचऱ्या थंडीत बसण्यापेक्षा तुझ्या घरी जाऊन का हे काम करीत नाहीस? तुझे आई-वडिल कुठे बाहेर कामाला गेलेत का?” इतका वेळ बाबा आणि त्या मुलाचा संवाद ऐकलेल्या थत्ते आजोबांनी मात्र आता न राहवुन त्या मुलाला विचारले.  आई-वडिल? कशे असत्यात ते? कशे दिसत्यात? ते तर म्या कधीबी पायले न्हाय..जसा माणुस कसा आसतो त्याला पोटाला खायाला लागत..रहायला..निजायला निवारा लागतो..कापडं लागत्यात आणि त्यासाटनं हरी पत्ती लागती एवढं कळाया लागलं तसा म्या बहुढंगी कामं करीत आलोय..पयला म्हंमईला हुतो एका दाढीवाल्या बरोबर. त्यो दाढीवाला बेक्कार माणुस हुता. बेकरीत, भट्टीत, काचच्या कारखान्यात, समुद्रातल्या खाडीत, जमिनीखालच्या नाल्यात असलेली लय बेक्कार आणि जीव जाईल अशी कामं मला कराया लावायचा त्यो......चिमणीएवढं तोंड करुन तो मुलगा मोठ्या नाराजीच्या सुरात त्याची कहाणी सांगत होता. तेवढ्यात....“म्हणजे तुझं या जगात कुणीच नाहीय म्हण. बिच्चारा!” थत्ते आजोबा त्या मुलाच बोलणं मध्येच थांबवत बोलले. व्हय मला कुणी नाही. म्हंमईतल्या त्या दाढीवाल्याचा डोळा चुकवुन लांबड्या आगीनगाडीत चढलो ते ह्या मोठ्या ठिकाणला उतरलो. हीथ म्या भली, बुरी माणसं पाह्यली. त्यातल्या भल्या माणसांनीच मला ह्यो पोट भरायचा रस्ता दावला.डबडबलेल्या चिमुकल्या डोळ्यांतुन आसवे गालावरुन टपकायच्या आतच त्या मुलाने पटकन ती आसवे आवरलीत.
     तु येतोस का रे माझ्या घरी?  माझीही अवस्था तुझ्यासारखीच आहे बघ. फक्त थोडा फरक आहे माझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडे नाही व तुझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाहीय. बाबाच घर कुठाय विचार कुणीही सांगेल तुला.”  बाबा एकदमच भावनाविवश होऊन बोलुन गेला. तुमच्या घरी नि मी? न्हाय न्हाय ते कस हुईल? आजपातुर मला आसं कुणी इचारल न्हाई. तरी बी बगतो.मुलगा डोकं खाजवतच बाबाला बोलला व तो पुन्हा त्याच्या गजरे विणायच्या कामात मग्न होऊन गेला.. आणि बाबा व थत्ते आजोबा घरच्या दिशेने चालु लागले...
    तशी बागेत उमललेली टवटवीत अशी रंगीबेरंगी सुवासिक फुलं तोडायला बाबाला मुळीच आवडायच नाही पण देवाला वहायला एखादच फूल बाबा त्या फुलझाडाची माफी मागुन तोडत असे. सकाळी नेहमीप्रमाणे बाबा देवपुजा करायला बसला नि काल संध्याकाळी देवीला वाहिलेला तो मोगऱ्याचा गजरा त्याने काढला. काल तर कित्ती सुंदर नि आज पार रया गेलेला कोमेजलेलां, सुकलेलां, काळवंडलेलां तो गजरा बाबाने पाहिला व त्याला त्या बागेत भेटलेल्या, गजरे विणणाऱ्या पोराची आठवण झाली. या कोमजलेल्या गजऱ्यातल्या फुलासारखचं त्या बापड्या पोराच आयुष्य बनलय.. ह्यातली ही फूलं शेवटी कचऱ्यातच जाणार...नाही...नाही...असं होता कामा नये. ह्या कोमेजलेल्या फुलांचा काहीतरी चांगला उपयोग व्हायला हवाय...असा विचार करुन बाबा उठला आणि बागेत जाऊन तो गजरा खताच्या पेटीत टाकला. हां आत्ता ती कोमेजलेली फूलं खतात व मातीत मिसळुन पुन्हा बागेतल्या इतर फुलझाडांना, फळझाडांना नव्याने फुलायला, नवीन बहर आणायला, जगायला मदत करतील. ह्या विचारातच बाबा घरात आला देवपुजा आटोपली..पण बाबाला कससच वाटत होतं एकदम रितं..रितं...
     वाचण्यासाठी  पेपर न घेताच खुर्चीवर तसाच रेलुन बसला.  तेवढ्यात त्याच लक्ष समोरच्या बाल्कनीत गेलं..कित्येक दिवस तिथे कुणी रहायला आलेलं न्हवतं पण आता मात्र बाबाला त्या बाल्कनीत एक चिमुकला मुलगा त्याच्या आईसोबत तुळशीला पाणी घालताना दिसला. शेजारीच एक माणुस पेपर वाचत बसला होता कदाचित त्यांचाच तो छोटा मुलगा असावा व काल रात्रीच ती फॅमिली त्या फ्ल़ॅटमध्ये शिफ्ट झाली असावी. दोघेही आई-बाबा त्या छोट्या मुलासोबत हातवारे करुन, टाळ्या वाजवुन, बोबड्या सुरात काहीतरी बोलुन त्याला खेळवत होते.

     त्या दोघांच्याही आनंदाला पारावार उरला न्हवता व तो छोटा जीवही त्यांच्यासोबत अगदी मजेत हसत-खेळत होता. हे दृश्य बाबा बराच वेळ न्याहाळत होता..ते पाहताना मात्र त्याच्या काळजाला घरे पडत होतीत..आणि तोच थकलेल्या, सुरकुतलेल्या, म्हाताऱ्या डोळ्यांतुन अश्रुंचा महापुर वाहु लागला...त्याला अस्वस्थ वाटु लागल..आजचा दिवस रोजच्या दिवसा सारखा नक्कीच न्हवता हे बाबाला जाणवायला लागलं. बाबा ताडकन उठला व गेली कित्येक वर्षे बंद असलेली आतली खोली बाबाने उघडली व तिथल जुनं लाकडी कपाट धाडकन उघडलं. तसे पटकन त्याने जपुन ठेवलेले तिचेलेकाचेकित्येक जुने फोटो, जुनी कपडे, जुनी खेळणी, जुनी पुस्तके-वह्या, सगळं सगळं त्याने भराभरा उपसुन त्या खोलीभर पसरुन ठेवल. हां..आजचा दिवस ह्या म्हणावं तर सुखद पण या घडीला बाबासाठी दुःखद आठवणींचा होता तर. एरवी बाबाने त्या खोलीला कायमचच टाळं ठोकल होत पण, आज बाबाच्या मनाने वेगळच काहीतरी ठाणलं होत...बाबा त्या प्रत्येक गोष्टीवरुन मायेनं..थरथरत्या हातानं स्पर्श करु लागला... तरीही त्याचं मन भरेना की काय म्हणुन त्यानं त्या वस्तु छातीशी घट्ट कवटाळल्या व तो लहान पोरासारखं बेसुर आवाजात आक्रोश करु लागला...त्याच्या आक्रोशात संबंध घरही जणु रडु लागलं. क्षणभर बागेतली फूलं-फळंही कावरीबावरी झालीत..देवघरातला देवही जागा व्हावा अशी तीव्र हाक बाबा आपल्या गेलेल्या पत्नीला व जिवंत असुनही मयतासमान असलेल्या आपल्या लेकाला व नातवंडाला घालु लागला...बाबाला आता हे सगळं असह्य झालं होत..खरंतरं ज्या नियतीने बाबाची ही अवस्था केली होती त्या नियतीलाही या गोष्टीची लाज वाटावी इतक्या खोलवर रुतलेल्या आंतरिक वेदनेने, ओढीने बाबा हमसुन हमसुन रडत होता. तेवढ्यात बाबाला जोराचा घाम फुटला व बसल्या जागीच बाबा धाडकन् कोसळला. बाबाचा जुनाट चश्मा फुटुन त्याच्या काचांमध्ये बाबांच्या या वस्तुंतल्या कित्त्येक आठवणींचे तुकडे-तुकडे दिसु लागले...
     तुम्हाला किती वेळा सांगितलय..अतिभावनिक होणं तुमच्या तब्येतीसाठी घातक आहे..तरी वेळ बरी थत्ते आजोबा कॉफी पिण्यासाठी म्हणुन तुमच्याकडे आले व तुमचा जीव वाचला..त्यांनी त्यांची खरी दोस्ती निभावली बाबा..काळजी घ्या.बाबाच बीपी तपासत तपासतच डॉक्टर बोलले. बाबाने डॉक्टर व थत्ते आजोंबांकडे पाहत स्मितहास्य केले.

     बाबा हळुच बेडवरुन उठला आणि बागेत गेला. तोवर त्या खतपेटीतल्या सुकलेल्या मोगऱ्याच्या पाकळ्या खतात, मातीत मिसळु पाहत होत्या..बाबा काही क्षण इतर झाडांकडे व त्या खता-मातीत मिसळलेल्या पाकळ्यांकडे पाहत राहिला. थत्ते आजोबा किचनमध्ये कॉफी बनवताना खिडकीतुन बाबाकडेच पहात होते. बाबा पुन्हा आत आला. त्याची चाल आत्मविश्वासाने ओतपोत भरलेली होती... मित्रा, माझ्यानंतर या बागेची काळजी घ्यायला कुणीतरी हवय..मग मीही वरुन आभाळातुन पावसासारखा बरसेन व या बागेतल्या आणि बागेची काळजी घेणाऱ्यालाही तृप्त करेन..बाबा थत्ते आजोबांना हसत-हसतच बोलला. थत्ते आजोबांना मात्र काही अर्थ लागेना त्यांना हा बाबा थोडा वेगळाच बाबा भासला. तोवर बाबाने वकिल साहेबांना फोन लावला. “हो आजच या..एक काम आहे..दत्तकपत्र आणि वारसापत्र दोन्हीं करायच आहे मला..”  हे फोनवरच बोलणं ऐकुन थत्ते आजोबांना तो गजरे विणणारा मुलगा, खतपेटीतला मोगऱ्याचा गजरा नि बहरलेली बाग...याचा अर्थ उमगला. त्यांनी बाबाकडे एक समाधानी व सहमतीची नजर टाकुन बाबाला कॉफी देऊ केली..आणि जणु आजवर त्याच्या आयुष्यात काही घडलच नाही या अविर्भावातच, मजेत बाबा कॉफीचे मस्त घुटके घेऊ लागला...

                                                                                                   लेखिका

                                                                                   शैलजा खाडे-पाटील.

Wednesday 9 May 2018

'पालवी' - एक लघुकथा.

    
पालवी

      शैलजा खाडे-पाटील.
     माणुस या दोन पायाच्या सस्तन प्राण्याला अफाट बुध्दीचं असं वरदान लाभलेलं आहे असं बोलतात. या बुध्दीच्या जोरावर तो सारासार प्रयत्न करुन त्याचं आयुष्य अधिकाधिक सोप्प करायचा उपद्व्याप करीत राहतो. काहीजण आयुष्यभर काही ना काही कमीच पडतं म्हणुन दिवसरात्र एक करुन पैसा नावाचं चलन खोऱ्यानं ओढत राहतात, तर कोणीतरी आहे त्यातच समाधानं मानुन आपलं कर्म करीत राहतो व गाठीला पैशांऐवजी चार माणसे जोडतो. माणसाला परमेश्वरानं एक वीत भर तर पोट दिलेल आहे आणि तो याच वीतभर पोटासाठी कितीही काबाडकष्ट करायला तयार राहतो.  
     अशाच माणसांपैकी असा एक नामदेव’,  एका टळटळीत दुपारी सोसायटीच्या बिल्डींगखाली २४ तास पहारा देण्यासाठी बसुन राहीलेला होता. त्याचा चेहराही फार लोकांचं लक्ष जाईल असा नक्कीच न्हवता. खुरटलेली दाढीचं ती काय त्याच्या व्यक्तीमत्वाची पक्की खुण होती. तशी ही दुपार त्याला थोडी अस्वस्थच करणारी होती कारण एकतर आजचा सुर्य हा रोजचा सुर्य नक्कीच नव्हता. वारुळातील एखादी मुंगीही सहज जळुन खाक होईल अशी आग तो ओकत होता. त्यालाही आता या माणुसनावाच्या प्राण्याने पृथ्वीतलावर चालविलेल्या विध्वंसाचा चांगलाच तिटकारा आला होता. म्हणुनच ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली माणुस जे-जे उपाय शोधत होता ते सगळे या तापत्या सुर्यापुढे शून्य बनत चालले होते. आणि दुसर त्याला अस्वस्थ करणारं कारण म्हणजे काल रात्री चालु झालेली त्याफ्लॅटमधील तिचीत्याचीभांडणं अगदी ऊनं वर येईतोवर चालुच होती. नेमक्या त्या पहिल्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या खालीच नाम्याची पहाराचौकी होती. त्यामुळे त्यालाही आता त्यादोघांच्या भांडणाच्या आवाजाची सवयच झाली होती. बहुदा रात्रीपासुन मस्त सुर्य डोक्यावर येईतोवर ती दोघं भांडुन भांडुन दमली असावीत आणि त्यांना जाम भुकही लागली असावी म्हणुनच दुपारच्या जेवणाचा ब्रेक त्यांनी घेतला असावा असा विचार नामदेवच्या मनात तरळुन गेला. तेवढ्यात त्याच्या डोळ्यांवर चकचकणारा प्रकाशझोत पडला त्यामुळे त्याने थोडे डोळे मिचकावुनच गेटकडे पाहिले तर तीच रोजची तिची नि त्याचीचंदेरी रंगाची शायनिंग चारचाकी जोरात धुरळा उडवत, डाव्या हाताला असणाऱ्या रुचिरारेस्टॉरंट च्या दिशेने गेली. मग नाम्याने अंदाज केलाच की साहेब चमचमीत पापलेटचच पार्सल आणायला गेले असणार. नाहीतर, तेंची ती मस्त लाली-पावडर थापलेली, अप्सरावानी कांती असलेली बायकु तिला असल्या सुरमई, पापलेट, ते चिकन ६५, खिमा पाव, असल्या वशाडाचा लय नाद! अगं यु नो आय एम गोईंग टु गिव्ह ए तर्री पार्टी टु आवर ऑल फ्रेंड्स!” असं काहीतरी ती नाईट वॉकला सोसायटीच्या खाली यायची तेव्हा नामदेवाच्या कानावर यायचा.  नेहमी असलीच पार्टी-बिर्टीची, रश्शाची, ते वीक एंड सेलिब्रेशनचं बोलणं नि मधनचं व़ॉव ग्रेट! कुल यार! ओ नो, रिअली...हॅ..हॅ..हॅ..हॅ..हॅ..हॅ..! हा सगळा प्रकार मुद्दाम नाही पण त्याच्या कानावर पडायचा.
      नामदेवला पण सोसायटीतल्या अशा त्याच्या दृष्टीनं हायफाय असणाऱ्या लोकांना न्याहाळायला भारी आवडायचं आता तो तर छंदच बनुन गेला होता. आणि तसही त्याला काम ते काय लाईट-पाण्याची सोय लावुन गेटवर येणा-जाणाऱ्यांची नोंद ठेवल्यानंतर सगळा वेळ तर त्याचाच असायचा..दारिद्र्याने पोखरलेल्या संसाराला स्वतःच्या कष्टाने भरुन काढण्यासाठी तो कधी कधी सकाळी ते रात्री व रात्री ते पुन्हा सकाळी अशा दोन-दोन डुट्या करीत असे. या डुट्यांमध्ये त्याला एक नाद लागला होता..होय..नाद! ‘माणसं वाचण्याचा नाद’! त्या माणसांना आतुन-बाहेरुन न्याहाळुन त्याला त्यांच्या मनात काय-काय चालु आहे हे सहज ओळखता येत असे. सोसायटीतली लहान मुले, म्हातारी-कोतारी माणसे, तरणीताठी पोरं ही सगळी नाम्याच्या ह्या नादामुळे मनाने त्याच्या जवळ आली होती. त्यांच्यात व नाम्यामध्ये एक विश्वासाचनातं तयार झालेल होत. पण का कोण जाणे सोसायटीतले काही काही लोकं मात्र त्याला त्याच्या हुद्द्याप्रमाणेच वागणुक देत असत. रुचिरा रेस्टॉरंटकडे जाणाऱ्या कारचा मालकही अशा माणसांपैकी एक होता. त्याची न नाम्याची रोजच नजरानजर व्हायची पण तो साहेब माणुस त्याला अगदी तुच्छतेच्या नजरेनं पहात असे व कधी कधी गेट नीट उघडलं नाही म्हणुन चार शिव्याही हासडत असे. सोसायटीत असे बरेच लोकं होते की त्यांच्याकडे डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक इ.इ. मोठ्या हुद्द्याच्या पदव्या होत्या व महिन्याला लाखोंच्या घरात त्यांची कमाईही असावी. पण ह्यातील काही माणसे म्हणजे नाम्याला निर्जीव पुतळ्यांप्रमाणेच वाटायचीत कारण आलिशान फ्लॅट, चकचकीत गाड्या, स्टायलीश कपडे व पंचपक्वान्नाच रोजचं खाणंपिणं या सगळ्या सुखांचा उपभोग घेऊनही ही माणसे मनाने मात्र समाधानी नसतात. असं नाम्याच पक्क मत झाल होत. अशांपैकीच एका जोडप्याची तर रोज रात्री काहीना काही भांडणं चालु असायची. ही नाम्यासाठी तर नित्यनेमाची बाब झाली होती. त्या साहेब माणसाला पाहिल्यावर नाम्याला त्याची किव यायची व या सायबापेक्षा तर मीच सुखी आहे अस त्याला मनोमन वाटायच.
कारण, तो गाव सोडुन वॉचमनची नोकरी करायला शहरात आल्यावर त्याची बायको व मुलानेही त्याला मोलाची साथ दिली होती. त्याचा मुलगा बाहेरुन कॉलेज शिकत शिकत कुठल्यातरी दुकानात कामाला होता तर, त्याची बायको त्याच सोसायटीमध्ये धुण्या-भांड्यांची कामे करीत असे. एका छोट्या भाड्याच्या खोलीत त्यांचा सुखाचा संसार सुरु होता. पण पोटाची खळगी भरतील एवढे पुरेसे भांडवल त्यांच्याकडे होते ते भांडवल म्हणजे त्यांचे धडधाकट हात-पाय! नाम्या अगदीच सामान्य असे जीवन जगत होता मात्र त्याला रोज रात्री सुखा-समाधानाची झोप लागायची. तो सोसायटीमध्ये घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या बायकोसोबत शेअर करीत असे. त्याची बायकोही त्याच सोसायटीत कामाला असल्यामुळे तिलाही काही घटनांची कारणे व त्यांचे होणारे परिणाम माहीत असायचेत. कुणी काही नवीन खरेदी केली, कुणीतरी आजारी आहे, शेजाऱ्यांमधल्या रुखरुखी, कोण आल-गेल याची माहितीही तिला असायची. पण या जोडप्याची एक चांगली सवय म्हणजे ते या गोष्टी सोसायटीतल्या अन्य कुणालाही न सांगता आपआपसांत शेअर करीत असत.
     त्यारात्रीची त्याची नि तिचीभांडणेही नाम्याने बायकोच्या कानावर घातली. तेव्हा त्याला अस कळलं की ती दोघंही मोठ्ठाल्या कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या लग्नाला ४-५ वर्षे होऊनही अद्याप मुलाबाळाचा विचार ते करीत नाहीयत. साहेबाला मुल हवयं पण ते करिअर की काय म्हणतात त्याच्यासाठनं मॅडमला मुलाबाळाची बेडी नकोय...असं काहीतरी बायजाने म्हणजे नाम्याच्या बायकोने साहेब नि मॅडमच्या घरी कामाला असणाऱ्या दुसऱ्या कुठल्यातरी बायकांकडुन ऐकलेल नाम्याला सांगितल. अशा किती बायका कामावर हायत म्हणे त्यांच्यात? तर गंमत अशी एक महिन्याच्या वर त्यांच्याकडे कामवाल्या बायका टिकतच नाहीत. कारण म्हणे त्या मॅडमचा तिरसाट स्वभाव. सोसायटीतल्या शिकल्या सवरलेल्या बायका म्हणतात की त्या मॅडमला लय दांडगा इगोहाय! असं बरचं नि बरचं काय काय बायजाने नाम्याला गुप्त बातम्या दिल्या. तेव्हा कुठ त्याला जाऊन कळलं की आजकालच्या बाया-माणसांना आईव्हायसाठीपण चक्क मनवाव लागतय! या काळ्या गर्द विचारानं त्याला त्या साहेबाची तर दयाच आली. सोन्याच्या ताटात नि चांदीच्या वाटीत जेवणारा गडी बापव्हायसाठी झुरतोय, बायकोला मनवतोय! तरच गेट उघडण्यावरुन मालक एवढा नाम्याला का झापतोय याच कारणही नाम्याला कळलं व तो मनातल्या मनात पक्का हसलाही. कारण घरच्या खाजगी भांडणाचा राग साहेब कुणावर आणि कुठ काढल याचा काही नेम नाही हे त्याला कळुन चुकल.
     या गोष्टीवर खुप विचार केल्यावर नाम्यामधला माणुसकीने भारलेला माणुसजागा झाला. भलेही ती लय मोठ्ठी लोकं हायत आपल्या सावलीची पण त्यांच्यासमोर उभा रहायची लायकी न्हाय पण एकांद्याचा संसार सुखाचा होत असलं तर तेवढ पुण्य पदरात पडलं. काय बी करुन या जोडप्यातला तंटा कायमचा निकाली लावायचा असं त्याच्या मनान ठाणलं. अशा विचारात असतानातच नाम्याला एक पदर खोचलेली बाई त्याच्याच दिशेने येताना दिसली. त्याने ओळखले ही त्या सारख्या सारख्या भांडणाऱ्या जोडप्याच्या घरात काम करणारीच बाई होती. तिचा चेहऱा रागाने लालबुंद झाला होता..ती दातओठ खात मुठ्या आवळत चांगली तणतणत नाम्यासमोर येऊन ऊभा राहिली. कामाला एक मिनीट जरी टाईम झाला तर मॅडम लय बडबडतीया..भांड्याचा ह्यो मोठ्ठा रगाडा नि कपड्यांचा ह्यो मोठ्ठा ढीग असतुया..आणि सणावाराला बोनस काहीतरी मागितल तर त्याच्याऐवजी पाणऊतारा करीत असतीया ती बया..आता मी काय तिच्याकडं कामाला जाणार नायती कामवाली बाई जशी बोलली, तसा नाम्या बोलला..अहो मावशी आपण काबाडकष्ट करुन खाणारी माणसं अशा तिरसाट लोकांच बोलणं नसतं मनावर घ्यायच. एक काम करतो मी माझ्या बायकोलाच तिथ कामावर लावून देतो. माझी बायको म्हणजे दुधात इरघळणारी साखर हाय साखर..कसल्याबी बाईमाणसांना रितीभातीनं ताळ्यावर आणती किनी बघाच तुम्ही!” हे ऐकुन ती कामवाली बाई तिचे इंचभर बाहेर आलेले दात काढत, फिदी फिदी हसतच निघुन गेली. बहुदा तिला नाम्याच्या बायकोची पण तिच्यासारखीच गत होणार असा पक्का विश्वास वाटुन ती त्या टर उडवणाऱ्या लयीतच गेटकडे रवाना झाली. रात्री जेवताना नाम्याने त्याच्या बायकोला त्या भांडखोर जोडप्याच्याघरी  कामासाठी जाण्यासाठी विचारले असता त्याच्या बायकोनेही आढेवेढे न घेता ही गोष्ट कबुल केली. कारण कितीही झाल तरी त्या आईपणटाळणाऱ्या बाईला तिलाही जवळुन पहायच होत.
     सकाळी पहिल्या कामाला म्हणुन ती त्या मॅडमच्याघरी पोहोचली. दोन-तीन वेळा बेल वाजवल्यावर, एस एस आय विल डेफिनेटली सेंड यु दॅट कन्फर्मेशन लेटर..यु विल बी अल्सो गिव्ह दि ओनली वन रिमांयडर टु मी अबाऊट धिस ओके..यु नो ना आय एम टुssssबीझी टुSS डु धिस लिटल थिंग्स...वन मिनट हां आय विल कॉल यु बॅक..असे बोलत तिने नाम्याच्या बायकोकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतच फोन बंद केला. हु आर यु..? कोण तु?” मॅडमनी तिला विचारले. मी बायजा..आगुदरच्या बाईच्या बदल्यात आजपासनं मी तुमच्याकडं कामाला येणार हाय. तिला वाईच बरं नाही म्हणुन...ती पुढचं काही बोलायच्या आतच, मॅडमनी त्यांच्या हातातला मोबाईल सोप्यावर फेकत टीपॉय वरचा पेपर तोंडासमोर धरला. इट्स ओके. मला फालतु बडबड ऐकायची सवय नाहीय यु नो? काम सगळी करुन घे आज आणि हो पेमेंट पुर्वीचीला जेवढ मिळायच तेवढच तुलाही मिळेल अंडस्टॅंड? चल माझ्यासाठी एकदम स्ट्रॉंग कॉफी बनव मग कामाच बघ तासाभरात सगळं उरकाव लागेल मलाही निघायचय ऑफिसलापेपरआडुन मॅडमच तोंड काही दिसत न्हवत पण हा धारदार आवाज मात्र बायजाच्या चांगलाच कानात घुमत होता. बायजाने कॉफीचा मग मॅडमच्या हातात दिला मॅडमनी पेपर न्याहाळतच तो तोंडाला लावला. अन..एकदम डोळे मिटले. वॉव यार, खुप दिवसांनी न्हवे महिन्यांनी मी असली स्ट्रॉंग नि टेस्टी कॉफी पिलीयअशी बेस्ट कॉंप्लीमेंट बायजाला पहिल्याच दिवशी मिळाली. कॉफी निम्मी अर्धी झाली असता मॅडमनी एकदम पेपर टाकला नि भारभार मशीन सारख्या घरभर पळु लागल्या म्हणजे अंघोळ पाणी, कपडे आवरुन त्या बायजासमोर आल्या तिला वॉशिंगमशीनच सगळ टेकनिक समजावुन सांगु लागल्या. ते सांगत असतानाच बायजा मॅडमना अगदी जवळुन न्याहाळु लागली. खांद्यापर्यंत कुरळे केस..घारे – निळे डोळे..कानात हिऱ्याचे दोन नाजुकसे खडे..चाफेकळीसारख नाक...अंगावर पॅंट-नि बिन बाह्याचा शर्ट..त्यालाच मॅचिंग लावलेली लिपस्टीक..आणि अंगाला येत असलेला कुठल्यातरी अत्तराचा वास..अस सगळं..जणु काही कॉलेजमधली सोळा सतरा वर्षांची कोवळी पोरचं ती जणु..! मॅडम आज तुम्ही एकदम झक्कास दिसतायासा बघाबायजा बोलली. हे बघ तुला मी आल्या आल्याच सांगितलय फालतु बडबड नको हे घे घराची किल्ली मी निघते.असे बोलुन मॅडम पाठमोऱ्य़ा झाल्या नि निघुनही गेल्या. एवढं मोठ्ठ घर नि किमती सामानाची त्यानला काय काळजी नसल का? तवा त्या माज्याकडं घराची किल्ली देऊन गेल्यात. दिसायला तर इंद्रदरबारातल्या रंभा,अप्सरांना बी लाजीवतील अशा हायत. वरती एवढ्या मोठ्या कंपनीत काम करत्यात. साहेब त्यांच्यावर किती प्रेम करीत असतील न्हाई. असच वाटतय पण त्यानला आईका व्हायच नसलं बर? खरच ह्या जगामधी अशी एखादी बाई असल का की तिला आई व्हायलाच नको वाटत आसल..असे बरेच नि बरेच विचार बायजाच्या मनात घोळत होते. त्या नादातच तिने घरातली सगळी कामं आवरुन ती दुसऱ्या कामांना निघुन गेली.
      दुपारच्या वेळेला नाम्याने बायजाला पहिल्या दिवशीचा वृतांत विचारला असता बायजाने सगळी बातमी नाम्याला दिली. व हळुहळु मॅडमच्या मनात घर करुन त्यांनला आई न होण्याच्या विचारातन बाहेर काढायचं अस दोघांनी निश्चित केल. दुसऱ्या दिवशी बायजा मॅडमकडे कामासाठी पोहोचली. बायजाने बनवलेल्या पहिल्या दिवशीच्या स्ट्रॉंग कॉफीची मॅडमना आता रोज चटकच लागली..त्या कॉफीसाठी तर त्या रोज आतुरतेने बायजाची वाट पाहु लागल्या. बाकी तिचं काम-बिमही त्यांना पसंत पडलं असावं. त्यांचा तो हेकेखोर नुर हळुहळु सौम्य आवाजात बदलु लागला..बायजाही त्यांच्या मुड्सच्या कलानेच सगळी कामं झट की पट करु लागली. महिन्याभरातच बायजाच व मॅडमच एक वेगळच असं नातं तयार झाल. कदाचित आपुलकीचं नातच असावं ते! बायजाला कळुन चुकलं की मॅडम तब्येतीला चांगल्या असणाऱ्या कारल्यासारख्याच हायत..कडु पण पोटात गेल्यावर सगळी दुखणी छु मंतर करणारे कारले..त्यांना वळकणं एवढं सोप्प न्हवतं. खुप म्हणजे खुप चढ-ऊतार पाहिलेल्या बाईंपैकीच त्या एक होत्या. पण हे पोरा-बाळाच त्यांच्या डोक्यात कसं घालायच त्यांच्या हेच काही केल्या बायजाला ऊमजत न्हवतं.
      एक दिवस बाल्कनीत बायजाच्या हातची कॉफी घेता घेता त्यांनी बायजालाही कॉफी देऊ केली. बायजानेही त्यांचा मुड बघुन, ही संधी आता सोडायची नाही अस मनात पक्क ठाणलं. मॅडमच्या बाल्कनीत मोगरा, जाई, मनीप्लॅंट, तुळस, सदाफुली, अशी बरीच नि शोची झाडं होती. पण एकच कुंडी माती असुनही रिकामीच बायजाला दिसली. तसं तिने मॅडमला याबाबत विचारले तेव्हा गेली ४-५ महिने त्या कुंडीमध्ये कुठलही रोपटं लावलं तर ते टिकतच नसल्याच आणि वाळुन जात असल्याच बायजाला कळलं. बायजा त्या दिवशी काहीच नाही बोलली. पण दुसऱ्या दिवशी- मॅडम मी काय म्हणते एखाद्याच्या हाताला बहर नसतोच मग ते रोज झाडाला खतपाणी घाला, काळजापल्याड जपा, पण एखाद्याच्या हाताला एवढा बहर असतो की वाळवंटात बी चार दाणं फेकल तर तिथ बी झाड ऊगवल. आहो खर हाय बर का हे! अशा भरल्या घरात असली रिकामी कुंडी ठेवणं चांगल न्हाय हो
बायजा आपली भित भित मॅडमना बोलली. कायतरीच गं तुझं! अडाण्या बायकांच्या अंधश्रध्दा आहेत गं या सगळ्या. त्या कुंडीतील मातीच खराब असणार म्हणजे त्यातुन नीट पाण्याचा निचरा वगैरे होत नसेल अस काहीतरी. मला तर त्या रिकाम्या कुंडीकडे पहायलाही वेळ नसतो गं! आता तुच बघ मस्त गेले ४-५ महिने त्या कुंडीत माझ्या नवऱ्याने ७-८  रोपं तरी लावुन पाहिलीत. पण त्यातल एकही जगलेलं नाहीय. कुणाला वेळ आहे गं  अशा फालतु गोष्टींकडे लक्ष द्यायला? ही तर माझ्या नवऱ्याची आवड आहे. बोलत असतो..निर्जीव वस्तुंपेक्षा सजीव वस्तुंमधला आनंद म्हणे त्याला घ्यायला आवडतो. एखाद्या जीवातुन दुसरा जीव तयार होणं आणि त्या दोघांतल नातं फुलत व फुलवत जाणं हा अनुभव बघायला किंवा घ्यायला शिकलं पाहिजे मग ते नात झाडाचं त्याच्या फुला-पानांशी असो नाहीतर माणसाच त्याच्या लेकराशी असो. असं काहीतरी ज्ञानाचे डोस तो वरचेवर मला पाजत असतो गं..मी ही त्याच्यासारखा विचार करीत बसले असले तर आज जे काही आलिशान घर, फर्निचर, मस्त मॉडर्न किचन, कोरी चारचाकी हे सगळं पहायलाच मिळाल नसतं बघ. माझ्या करिअरला वेळ दिला म्हणुन तर आज हे सुख माझ्या पायाशी आहे मॅडम गरमागरम कॉफिचे घुटके घेत घेत बोलल्या.
     हे ऐकताना बायजा मात्र मनातल्या मनात खुपच खुष झाली कारण तिला जो विषय इतके दिवस मॅडमसोबत बोलायचा होता त्याच विषयावर मॅडमच्या बोलण्याची गाडी आलेली होती. आता बायजाने डाव हातचा जावु द्यायचा नाही असं मनोमन ठाणलं, आणि धाडस करुन ती मॅडमना बोलली- हे बघा मॅडम तुमासनी राग आला तर इऊदे..पर साहेबांच म्हणणं तर मला पटतया. आता तुमाला एक टाईम नसतो या रिकाम्या कुंडीकडं बघाया पण साहेबांची इच्छा बघा, कितीदा त्यांनी त्या कुंडीत झाड जगुन,त्याला पालवी फुटुन, त्याच्यावर कळी उमलावी म्हणुन प्रयत्न केले किनी..एवढ्या मोठ्या पदावरचा गडीमाणुस त्यो तेची इच्छा ती केवढी..फकस्त झाड जगावं नि ते चांगल फळा-फुलांनी बहरावं एव्हढच. मॅडम कुणीतरी कुणाच्यातरी रक्तामासातनं जन्माला आलं..उमललं म्हणुनच हे समदं जग चाललय न्हवं? आता तुमी मिनीटभर इचार करुन बघा की जगातल्या कुठल्याच झाडाला नवी पालवीच फुटली नसती, त्याला कळ्या-फुलं-फळं अस काय बी उगवल नसतं तर हे समदं जग वाळवंट बनल नसत का? मग तर तुमी, मी आपणं कोणचं नसतो. बराबर किनी? आओ जसं झाडांच तसच माणसांच नाही का? माणसाची जिंदगी बी वाळवंटच बनल जवा तेच्या जिंदगीत नवीन नात्याची पालवी फुटणार न्हाय! म्हणजे संसाराच्या वेलीला एक तरी कळी येऊन ती फुलली पाहिजेच. बरं ती कळी येऊ द्यायची इच्छा तरी मनात आणावी किनी माणसानं तरच तेची जिंदगी सफल हुतीया बघा. आई होणंम्हणजे बाईच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखच हाय. हे तुमी समजुन घेतल पायजे...यातला आनंद एकीकडं आणि जगातली समदी सुखं एकीकडं अस गणित हुतया मग. मग या अशा रिकाम्या कुंडीत नि आपल्यात काय फरक राहिला सांगा बरं? मस्त सुखं लोळण घेत्यात एकेकाच्या संसारात पण ज्यांच्या संसाराच्या रोपट्याला कधी पालवीच फुटत नाही त्यांना इचारा की त्यांच हे दुखणं म्हणजे या रिकाम्या कुंडीगतच असतया. मग अशी दुखऱ्या मनाची बाया माणसं..दुसऱ्यांच्या फुललेल्या कळ्या-फुलांवर भरभरुन प्रेम कराया लागत्यात...आणि..
 यु स्टॉप धीस नॉनसेन्स प्लीज स्टॉप. गेट आऊट..लिव्ह मी अलोन. बावळट बाई चल निघ हीथुन. तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या पर्सनल गोष्टीवर बोलायची? तुझ्यासारख्या बायकांना मी चांगलच ओळखते कुणाच्यातरी भावनांना हात घालायचा नि ते सगळं जगभर चघळत रहायच. यु गेट आऊट्ट!” मॅडम रागाने लालबुंद झाल्या होत्या..बायजाचं बोलणं मध्येच तोडन तिला त्यांनी निघुन जायला सांगितल. आणि रागाच्या भरात त्यांनी ती रिकामी मातीची कुंडी जोरात जमिनीवर फेकली तशी कुंडीचे तुकडे होऊन कुंडीतली माती सगळ्या बाल्कनीभर झाली. हे पाहुन बायजाचा चेहरा काळाठीक्कर पडला. व तिने डोळे पुसत घरातुन काढता पाय घेतला.
      मॅडम बराच वेळ बाल्कनीत बाकीच्या झाडांकडे एकटक पाहत उभ्या राहिल्या. आज ऑफिसलाही येणार नसल्याच कळवुन टाकलं. सगळीकडे एक वेगळीच पण घुसमटलेली शांतता पसरली होती. खरंतरं बायजा जे काही बोलली होती त्यातला शब्द नि शब्द त्यांच्या कानात घुमत होता. नुसता शब्दच नाही तर त्यातला खोलवर दडलेला अर्थही मॅडमना मनातुन अस्वस्थ करीत होता. दिवस कसा मावळला ते कळलच नाही. डोकं चांगलच ठणठणत होतं. तेवढ्यात बेल वाजली. साहेब ड्युटीवरुन आले होते. मॅडमचा चेहरा पाहुन नेहमीप्रमाणे ते काहीच न बोलता फ्रेश होऊन त्यांनी दोघांसाठी कॉफी बनवली. एकंदरीतच मुड ऑफ असल्याच त्यांना कळलं होत. त्यांच लक्ष बाल्कनीतल्या त्या रिकाम्या फुटलेल्या कुंडीकडे गेलं. ते पाहुन त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवत सगळे तुकडे व माती साफ केली. ते करीत असतानाच आपलाही संसार या फुटक्या कुंडीसारखाच झाल्याच त्यांना वाटल. थोडा वेळ असाच गेला निःशब्द...! फक्त एका वाक्यातच आज रात्री डीनरला बाहेर जाऊयात अस त्यांनी मॅडमना सुचित केल. काहीही न बोलता मॅडमनेही होकाराची मान हालवली. इकडे नाम्याला बायजाने मॅडमसोबत घडलेला सगळा वृत्तांत सांगितला व परत कामावर जाणार नसल्याच सांगितलं. आता मात्र नाम्या चांगलाच ढवळुन निघाला याच विचारात असताना मॅडम नि साहेब कारमधुन जाताना त्यानं गेट उघडलं व त्याला आता आशा वाटु लागली की बायजाच्या बोलण्यानं मोहरीभर तर फरक पडला आसलच की मॅडमच्या इचारात. नाहीतर आज बऱ्याच दिवसांनी तो त्यादोघांना एकत्र जाताना पाहत होता.
     इकडे डीनर करतानाही साहेब व मॅडमच्या मध्ये ऑर्डरच जुजबी बोलण झालं. ते घरी येईतोवर साहेब अंदाजच बांधत होते की नेमकं काय घडलं असावं? बर डायरेक्ट विचारावं तर परत त्याच त्याच भांडणाची भिती की जी ४-४ दिवस मिटण्याच नाव घ्यायची नाहीत. त्यापेक्षा स्वतः बोलेल तेव्हा बोलेलम्हणुन साहेब मॅडमशी जास्त काही बोलणंही टाळत होते. रात्री झोपतेवेळी ते ऑफिसचे महत्वाचे मेल्स चेक करीत असताना...अचानक मोठ्ठा रडण्याचा हुंदका त्यांच्या कानावर पडला. त्यांनी पाहिल तर मॅडम ओक्साबोक्शी रडत होत्या. तोच मॅडम एखाद्या निरागस बाळासारख्या त्यांच्या कुशीत विसावल्या व आता मात्र त्यांच्या भावना अनावर झाल्या व अश्रुंचा अभिषेकच जणु त्या साहेबांना घालत होत्या. सॉरी....आजपर्यंतच्या माझ्या निर्णयाचे परिणाम तुला भोगायला लागले..त्या रिकाम्या कुंडीत इवलुस रोपट जगवण्याची तुझी धडपड मला कळायला हवी होती रे...आपण उद्याच गायनॅक कडे जाऊ..मॅडम हुंदके आवरतच बोलल्या. हे ऐकुन साहेबांच्याही डोळ्यांत आसवांचा पाझर फुटला. आज कित्येक वर्षांनी त्यांच्या मनात पिटुकल्या पावलांच्या आशेची पालवी फुटली होती...
नाहीतर माणुस आशेवरच जगत आलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाम्याने दोघांनाही गाडीतुन जाताना पाहिले. दोघांचेही चेहरे आनंद व एका वेगळ्याच ओढीने भारलेले त्याला दिसले. दुपारी बायजा व नाम्या जेवण आटपुन दोघेही निवांत टेकले होते. तेवढ्यात साहेबांची गाडी आली. नाम्याने नेहमीप्रमाणे गेट उघडले..गाडी पार्क करताना नाम्या व बायजा दोघेही गाडीकडे रोखुन पाहत होते. तेवढ्यात मॅडम गाडीतुन खाली उतरल्या आणि....त्यांच्या हातात एक नवी कोरी अशी बहुतेक गुलाबाच रोपट असलेली कुंडी होती विशेष म्हणजे त्या रोपट्याला लालसर-तांबुस अशी नाजुक इवलुशी पालवी फुटलेली होती. ते पालवीफुटलेल गुलाबाच रोपट दिसताच बायजा व  नाम्या एकमेकांकडे समाधानी व आनंदी नजरेने पाहतच राहिले...आणि दोघांचेही डोळे आनंदाश्रुंनी डबडबले..

                    पालवी-एक लघुकथा.
              लेखिका- शैलजा खाडे-पाटील.