लॉकडाऊन...!
Story By - शैलजा खाडे, कोल्हापुर.
सकाळची कोवळी ऊन्हं
केव्हाच सरली होती. परड्यात दावणीच्या गाईची चाऱ्यासाठी धडपड सुरु झाली होती...तरी
‘तो’ अजुनही गोधडीत तसाच पहुडलेला होता.
पहाटेच त्याचा डोळा खुलला, पण रोजच्या जगण्याची भ्रांत त्याच्या जीवाला अशी काही
बैचेन करीत होती की, तो तास न तास तसाच पडुन रहायचा.
त्याचे खोलवर गेलेले डोळे तो सताड
ऊघडे ठेवून एकेकाळी ऊराशी फुलाप्रमाणं बाळगलेलं आणि आता मात्र तेच भंगलेलं स्वप्न
काळजात साठवून तो ठेवायचा. शेतात हिरीरिनं करण्यासारखं काहीच काम नसल्याकारणानं तो
गेले पंधरा दिवस चुळ भरुन पुन्हा गोधडीचं मुळकुट करुन ऊन्हं तळपेतोवर त्या मुळकुटाला
टेकुन बसुन रहायचा...“आओ ऊठा वाईच च्या तरी घ्या की. किती दिस असं दगडागत बसुन
ऱ्हाणारा? नुसकान तर झालया, पर आपला जीव तरी शाबूत हाय न्हवं?
ह्यातच त्या पांडुरंगाला हात जोडायचं. ऊठा चाटदिशी. पोरगं बी
तुमच्याकडं बगुनशान कावरंबावरं हुतया. तेच्याकडं तरी प्हाय तुम्ही”. चुलीवरच चहाच आधणं वाटीत ओतत त्याची बायको त्याला बोलली. तसं त्याची कोरडी
नजर खेळतेल्या पोरावर फिरली व चाऱ्यासाठी आसुसलेल्या गाईवर येऊन थांबली. त्यांना
पाहुन त्याला थोडीफार तरतरी आल्यासारखी झाली, आणि ती चहाची वाटी पुढ्यात ओढुन त्यानं
त्याचे दोन्हीं हात दोन्हीं गुडघ्यावर टेकले आणि पुन्हा गोधडीच्या मुळकुटाला तो टेकुन
बसला. “आपल्याला आपलं लेकरु तसंच शेतातली फुलं व्हती...ह्या
ह्या हातानं घास भरवावा तसं त्यानला पाणी-लागवड दिली पर आज ती मातीत पार रयाला
जातेली बगुन कोणला सुखं वाटल बाय? मला तर हे जिणं सुदीक
मयतासमान वाटायलय. आगं कस नुसकान भरुन काडायचं दोन लाखाचं?
सगळं किडुक-मिडुक झेंडवांच्या मशागतीला इकलं..आता तर इक खायाला बी पैकं न्हाईती...!” असं बोलुन तो बसल्याजागी टपटप आसवं गाळु लागला.
तशी त्याची बायकोही
डोळ्यांना पदर लावुन मुसमुसु लागली. काही क्षण असेच गेले केवळ हुंदक्यांचा आवाज!
पुन्हा ती पुढे सरसावली व चहाची वाटी त्याच्या तोंडासमोर धरली. तसा
तो भानावर आला व वाटीतला गारगीच चहा त्यानं फटकन एका घोटात पोटात ढकलला. पुन्हा तो
शांत होऊन शुन्यात नजर लावुन बसला. तिनं चुलीतला पेटता निखारा वाया जाऊ नये म्हणुन
पटकन त्या चेपक्या डब्यातले पार तळाला गेलेले तांदूळ धुऊन चुलीवर भात चढवला...नि
एक हात डोक्याला लावुन निखाऱ्यातल्या ऊष्ण धगीकडं ती कितीतरी वेळ पाहत राहिली...
निसर्गाला आव्हान न
देता त्याची नेहमीच पूजा करणारा बळीराजा नियतीसमोर पुरता हतबल झाला होता. म्हणुनच,
या निराशेच्या गर्तेत तो खोल डुंबून बुडून मरेल की काय? या
भितीनं त्याची सहचारिणी त्याला रोज धीर देत होती...तिचा घरधनी मनानं पार चिंबून
गेला होता, याची तिला जाणीव होती. आजवर शेतातल्या त्या निर्मळ फुलांवर तिचा आखीव
रेखीव संसार गोड फुलावानी चालला होता. पण यंदा या विषारी रोगामुळं तिच्या या
फुलाप्रमाणं दरवळलेल्या संसाराची निर्माल्यासारखी अवस्था व्हायची वेळ आली होती. जर
तीच खचली तर त्याचं नि लेकराचं कसं होणारं? या काळजीनं तिचा
जीव खात होता म्हणुन तर शेतीतलं कितीही नुकसान अंगावर पडुदे पण ती मात्र नियतीसमोर
अजिबात ढळणार न्हवती...
जसजसं शेत जवळ येत होते, तसतसं त्यांची पाऊलं जड होत चालली होती...इतका वेळ निःशब्द राहुन तिघंही शेताच्या बांधावर आले. त्यांनी मोठ्या जड काळजानं चहुबाजूंनी पसरलेल्या त्या ‘पिवळ्या सोन्यावर’ नजर फिरविली. जवळपास महिनाभर ती गोंडस, गोजिरवाणी झेंडुची फुलं तोडणीविना तशीच झाडाला लटकुन होतीत. कितीतरी कोस पसरलेल्या त्या वावरात सगळ्या पिवळ्याशार फुलांनी झाडावरच माना टाकल्या होत्या. त्यात पुरेसं पाणीही नसल्यानं व कडक ऊन्हानं ते पिवळधमक सोनं आता पार काळवंडुन गेलं होतं. नुसता हात जरी लावला तरी पाकळ्या गळुन पडाव्यात अशी केविलवाणी अवस्था त्या फुलांची झाली होती. तीन महिन्यांपुर्वी ह्याची सुरुवात करताना त्या बळीराजाच्या ऊरात स्वप्नांची अशी काही दाटी झाली होती की तो ऊत्साहानं पार हरखुन गेला होता. वेळच्यावेळी केलेली मशागत-लागवड-पाणी त्याला त्याची पोटची भाकरी मिळवुन देणार होते. पण यावेळी काळाचा फास त्याच्याभोवती घट्ट आवळला होता. डोळ्यांनी न दिसणाऱ्या त्या भयावह विषाणुने या कष्टाळु शेतकऱ्याच्या डोळ्यांतले भाकरीचे स्वप्न पार धुळीला मिळवले होते...
ऊन्हं आता माथ्यावरुन कललेली
होतीत. त्याच्या साक्षीनं ती तिघंही बांधावर ऊभा राहुन मयतासमान फुलांकडं एका भकास
नजरेनं पाहत होतीत. अशा दिनवाण्या फुलांकडं पाहुन त्यांच्या काळजाच पाणी पाणी झालं.
त्यानं ऊभ्या ऊभ्या त्या एकेकाळी बहरुन ओंसडणाऱ्या पण आता विरुन गेलेल्या त्या
वावराला हात जोडले...बांधावरुन थोडं पुढं होऊन त्यानं खिशातली माचिस काढली व त्यातली काडी पेटवुन वावरात
टाकली...निम्म्याहुन अधिक वाळलेल्या, सुकलेल्या फुलझाडांनी काही वेळातच पेट घेतला.
मयताला अग्नी द्यावा तसा अग्नी त्यानं आज आपल्या वावराला दिला होता. हे अग्नितांडव
पाहुन चिमुकल्याच्या डोळ्यांतही पाणी दाटुन आलं. त्यानं एकवार पेटत्या फुलांकडं
पाहिलं व आपल्या मायला घट्ट मिठी मारली व तिच्या पदरात तोंड खुपसुन तो ओक्साबोक्शी
रडु लागला. तसा मायेनं दाटलेल्या आईलाही तिचा हुंदका आवरेनासा झाला व तिचे अश्रुही
पोराच्या अश्रुमध्ये मिसळुन गेले. आता बळीराजाच्या अश्रुंचाही बांध फुटला.
वावरातल्या त्या स्मशानशांततेत तिघांच्या हुंदक्याचे आवाज घुमु लागले. शेजारच्या
आंब्याच्या झाडावरचे पक्षीही पंखांची केविलवाणी धडपड करुन फडफडु लागले. भावनांचा
हा पसारा साक्षात परमेश्वरालाही आटोपता न येण्यासारखा होता म्हणुनच इतके दिवस
शेताचा धनी शेताकडं यायला धजत न्हवता. पण त्याला रोजची वाट विसरुन चालणार न्हवती. त्याची
काळी आई त्याला सारखी साद घालत होती. संसारापेक्षा अधिकचे प्रेम तो आपल्या शेतावर
करीत होता. तिच्या पोटी जन्मलेल्या या पेटत्या फुलांकडं पाहुन त्याचं आतडं आज तिळं
तिळं तुटत होतं. त्याच्या यंदाच्या भविष्याची राखरांगोळी ऊभ्या डोळयानं तो पाहत
होता. नशीबाचे हे हारलेले भोग सोसुन सोसुन बळीराजा शेवटी मनानं व भावनेनं बधीर
झाला. काही क्षणांसाठी तो स्तब्ध झाला नि आता तिघांनीही काळजावर दगड ठेवुन तिथुन
परतीची वाट धरली...
घरच्या छताखाली जाऊन टेकल्यावर,
शेजारच्या दोस्तानं लांबुनच ‘आज लॉकडाऊन’ संपल्याची बातमी त्यांना दिली. पण आता
काळाचे काटे कधीच पुढं सरकले होते कारण,तिकडं वावरात पेटलेली वाळकी फुलं आता राखेत
विलीन झाली होती..कदाचित देवाच्या पायी जाण्याचं भाग्य घेऊन ती जन्माला आलेलीच
न्हवती. लोकांचे जीव वाचावेत म्हणुन सरकारनं जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊननं’ आज बळीराजाचं भविष्यच ‘लॉक’ करुन टाकलं होतं...आणि तिकडं राखेत फुलं
निवल्यानंतरची जी भयाण शांतता दाटली होती तीच भयाण शांतता त्याच्या घरावरतीही कब्जा
करुन होती...!
Story By – शैलजा.